Published On : Tue, Feb 13th, 2018

एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानात तांत्रिक बिघाड

Advertisement

Air Indiaनागपूर : मंगळवारी सकाळी मुंबई येथून नागपूर येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीनंतरही विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यावर, प्रवाशांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात स्थानांतरित करून नागपुरात आणण्यात आले. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना तब्बल पाच तास विमानातच अडकून राहावे लागले.

एअर इंडियाचे ‘एआय ६२७’ हे विमान मंगळवारी सकाळी ५.४५ वाजता मुंबईहून नागपूरसाठी उडणार होते. विमानात सुमारे १०० प्रवासी होते. सकाळी ५.१५ वाजता बोर्डिंग आटोपल्यावर विमान ‘रन-वे’कडे निघाले असता, त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे विमान रन-वेवर न नेता तेथेच थांबविण्यात आले व तांत्रिक दुरुस्ती केली जात असल्याचे सांगण्यात आले. सकाळी ७.३० पर्यंत दुरुस्ती सुरू राहिल्यानंतर संबंधित विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याची घोषणा पायलटने केली. प्रवाशांना दुसºया फ्लाईटमध्ये शिफ्ट केले जाईल, असेही सांगण्यात आले. यानंतर अर्ध्या तासाने ८.०५ वाजता एअर इंडियाचे दुसरे विमान लावण्यात आले व त्यात प्रवाशांना स्थानांतरित करण्यात आले. ८.४० वाजता विमानाने उड्डाण घेतले व सकाळी १०.१० वाजता नागपूर विमानतळावर पोहचले.

विमानाला विलंब होत असल्यामुळे सुरुवातीचे दोन तास प्रवाशांनी संयम बाळगला; नंतर मात्र, नेमके काय सुरू आहे, अशी विचारणा रनिंग स्टाफकडे केली. प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर लगेच सूत्रे हलली व दुसऱ्या विमानाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे सकाळी ७.१५ वाजता नागपुरात पोहचणार असलेले प्रवासी १०.१५ वाजता पोहचले.