Published On : Wed, Jul 26th, 2017

या पावसाळ्यात घ्या आरोग्य आणि आहाराची विशेष काळजी…राहा स्वस्थ व निरोगी!

Advertisement
Monsoon Health

Representational pic


नागपूर
: अन्न ,वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. पण जीवनाच्या धकाधकीत आरोग्य आणि आहाराकडे अनेकांचे दुर्लक्ष होताना दिसते आहे. त्यामुळे आपल्याला पचनासंबंधी विकारांना बळी पडावे लागते. अपचन, भूख न लागणे, मलप्रवृत्ती साफ न होणे, जेवल्या नंतर लगेच शौचाची भावना होणे, भोजनानंतर घाबरल्या सारखे वाटणे, वारंवार तोंड येणे, वायू, आम्लपित्ताचा त्रास होणे या तक्रारी आज बऱ्याच लोकांना असतातच.

असे म्हणतात की, गृहिणी दक्ष असेल तर घर देखील उत्तम असते. त्याच प्रमाणे शरीरातील ग्रहणी हा अवयव चांगला असला तर आरोग्य उत्तम राहते. ग्रहणी च्या ठिकाणी समान वायू स्थित असतो. अन्नम गृहाती पचती विवेचायाती मुछति ! हे त्याचे कार्य असते. आहाराला ग्रहण करणे, त्याचे पचन व त्यातील आहाराचे विघटन करून निवडणे व नंतर मोठ्या आतड्या मध्ये पाठविणे हे त्याचे कार्य आहे. तसेच ग्रहणी हे अग्नीचे स्थान देखील आहे. आहार वेळेवर न घेणे, घाई घाईत अन्न घेणे, आहारात स्निग्ध पदार्थ नसणे, अति मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ खाणे या सर्व कारणांनी हा समान वायू व हि जठराग्नी प्रकुपित होते व आपल्याला विविध पचन संस्थेचे विकार होतात. वागभट्टाने म्हंटले आहे, रोगः सर्वे अपी अग्निमान्द्यौ ! म्हणजे सर्व रोगाचे कारण जठराग्नीचा क्षय आहे.

अपचन – घेतलेल्या अन्नाचे पचन ६ तासामध्ये होते, पण काही लोकांना वारंवार खाण्याची सवय असते त्याला अध्याषण असे म्हणतात, तसेच अग्नी मंद असताना जर आहार घेतला तरी अपचन होते तेव्हा पोट गच्च भरल्या सारखे वाटणे जेवल्यानंतर घाम सुटणे, घाबरल्या सारखे वाटणे आदी लक्षणे दिसून येतात. अश्या वेळी लंघन करने म्हणजे उपाशी राहणे हि चिकित्सा उपयोगी ठरते.

आम्लपित्त – अति तिखट, अति मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानी, अति आंबट पदार्थ, अवेळी जेवण केल्यानी, जागरण झाल्याने आम्लपित्तचा त्रास होतो. काही लोकांना हा त्रास इतका जास्त असतो की त्यामुळे त्यांना खूप घाम येणे, घाबरल्यासारखे वाटणे, चक्कर येणे हि लक्षणे देखील उत्पन्न होतात. तसेच अम्लापित्तामुळे हायपरटेन्शन , गॅस्ट्रिक अल्सर, डुएडोन अल्सर अश्या पोटाच्या समस्या देखील होऊ शकतात.

मलबद्धता – अवेळी चुकीचे अन्न घेणे, रात्रीजागारण, बैठे व्यवसाय, व्यायामाचा अभाव या सर्व कारणांनी आज ६०-७० % लोकांना मलबध्दतेचा त्रास होतो. जर मलबद्धता दीर्घ कालीन असली तर त्यामुळे पाइल्स, फिशर या सारखे विकार देखील होतात. कधी कधी मल प्रवृत्ती चूर्ण,एरंड तैल हे घेतल्यावर हि मल प्रवृत्ती होत नाही. कारण शरीरातील रुक्षता अधिक वाढलेली असते. अश्या वेळी गरज असते स्नेहनाची.

पचन संस्थेचे विकार अनेक आहेत पण वरील विकार हे साधारणपणे सर्वांमधेच आढळतात. ह्या विकारांना दूर ठेवण्यासाठी आहार व विहारावर विशेष भर देणे आवश्यक आहे. आहार योग्य प्रमाणात व योग्य वेळी घेणे, आहारात फायबरचे प्रमाण अधिक असणे, कोष्ण जल सेवन करणे, अधिक तिखट, मसाल्याचे, शिळे अन्न, आंबवलेले अन्न सेवन करू नये. तसेच रात्रीच्या वेळी दही घेऊ नये. फ्रीज मधील पाणी घेऊ नये. जेवणानंतर शतपावली करावी. रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान २ तासाचे अंतर असावे. तसेच योग्य व प्राणायामामधे वज्रासन, भुजंगासन, शलभासन, भ्रस्थिका प्राणायाम, शितली, सित्कारी प्राणायाम इत्यादींचा नियमित सराव करणे हे उपयोगी ठरते.

Visit for more details.