
मुंबई : ओडिशा राज्यसभा निवडणुकीत भाजपाने प्रभावी कामगिरी करत दोन अधिकृत उमेदवारांसह पक्षाच्या पाठिंब्याने उभ्या असलेल्या तिसऱ्या उमेदवारालाही विजय मिळवून दिला. या संपूर्ण प्रक्रियेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियोजन आणि नेतृत्वाची निर्णायक भूमिका राहिली.
भाजपाकडून या निवडणुकीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेल्या बावनकुळे यांनी ओडिशात मुक्काम ठोकत आमदारांशी सातत्याने संपर्क साधला. मतदानाचे अचूक गणित मांडत त्यांनी पक्षातील समन्वय मजबूत केला, ज्याचा थेट परिणाम निकालात दिसून आला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी हा निकाल नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाचा आणि भाजपाच्या धोरणांचा विजय असल्याचे सांगितले. आमदारांनी दाखवलेल्या एकजुटीमुळेच हे यश मिळाले, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच त्यांनी अमित शाह, नितीन नबीन, देवेंद्र फडणवीस, मोहन चरण माझी आणि मनमोहन सामल यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
ओडिशा विधानसभेत भाजपाकडे ८२ आमदारांचे संख्याबळ असून विरोधकांकडे ६५ आमदार आहेत. चार जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण पाच उमेदवार मैदानात होते. अधिकृत उमेदवार म्हणून मनमोहन सामल आणि सुजित कुमार, तर दिलीप राय हे पक्षसमर्थित उमेदवार होते. मतसंख्येनुसार दोन जागा निश्चित असतानाही, प्रभावी रणनीतीमुळे भाजपाने तिसरी जागाही आपल्या खात्यात जमा केली.
या निकालामुळे ओडिशातील भाजपाचे राजकीय वर्चस्व अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट होत असून आगामी राजकारणात त्याचे महत्त्वपूर्ण पडसाद उमटण्याची शक्यता आहे.








