
मुंबई : दहावीच्या बोर्ड परीक्षेबाबत मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. Central Board of Secondary Education (CBSE) ने विद्यार्थ्यांना आता एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा दहावीची परीक्षा देण्याची संधी देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून त्या १८ मार्चपर्यंत चालणार आहेत. यंदा राज्यभरातून १६ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनेक केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून उडन पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसावा.
CBSE बोर्डाने स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रयत्नाला उपस्थित राहणे बंधनकारक असेल. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिल्यास दुसऱ्या संधीस बसता येणार नाही. यासंदर्भात कोणतीही विशेष परवानगी दिली जाणार नसल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.
तसेच, जे विद्यार्थी किमान तीन विषयांना उपस्थित राहणार नाहीत, त्यांना “Essential Repeat” श्रेणीत टाकण्यात येईल आणि त्यांना पुढील वर्षी मुख्य परीक्षा पुन्हा द्यावी लागेल. मात्र, जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील, त्यांना कमाल तीन विषयांमध्ये गुण सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
नवीन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी मिळेल आणि परीक्षेचा मानसिक ताण कमी होईल, असा शिक्षण तज्ज्ञांचा विश्वास आहे.








