
मुंबई : केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी धोरणांविरोधात विविध केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आज देशव्यापी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. मुंबईसह राज्यभर मोर्चे, निदर्शने आणि आंदोलनांचे आयोजन करण्यात आले असून, मुंबईत वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर दुपारी तीन वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात इंटक, आयटक, एचएमएस, सीटू, एनटीयूआय, भारतीय कामगार सेना, एआयसीसीटीयू, एआयबीईए, बीईएफआय, एआयआयईए, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, श्रमिक एकता मंच, कामगार एकता, स्वतंत्र फेडरेशन आदी २० हून अधिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकार कठोर व उदासीन भूमिकेतून पाहत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला संसदेतून जागे करावे लागेल, अशी तीव्र प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
कामगार संघटनांच्या मते, २९ जुने कामगार कायदे रद्द करून चार कामगार संहिता लागू केल्यामुळे कामगारांचे हक्क आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एनटीसीच्या २३ हून अधिक गिरण्या गेली पाच वर्षे बंद असल्याने हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी शंभर वर्षांच्या संघर्षातून मिळविलेले कामगारहिताचे कायदे रद्द केल्याने कामगारांचे भविष्य अंधारात ढकलले गेले असल्याची टीका केली.
या बंदमध्ये बँक कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, फेरीवाले, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, बस, रिक्षा आणि टॅक्सी चालक तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. सार्वजनिक वाहतूक, बँकिंग, विमा सेवा, सरकारी कार्यालये, बाजारपेठा आणि शाळा-महाविद्यालयांवर या बंदचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. मात्र रुग्णालये, औषधांची दुकाने, रुग्णवाहिका सेवा, दूध व भाजीपाला पुरवठा, अग्निशमन व आपत्कालीन सेवा तसेच वीज व पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘भारत बंद’ला महाराष्ट्र काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. केंद्र सरकारचे धोरण कामगार व शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत पक्ष पदाधिकाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली. देशभरात आज होणाऱ्या या बंदकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याचा जनजीवनावर किती परिणाम होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








