
नागपूर – हनुमाननगरातील क्रीडा चौक येथे भरलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025 ला मंगळवारी अजय–अतुलच्या दणदणीत लाईव्ह कॉन्सर्टने उत्कर्षबिंदू मिळाला. सलग १२ दिवस रंगलेल्या महोत्सवाचा समारोप खऱ्या अर्थाने ‘सुरांची मेजवानी’ ठरला. हजारो प्रेक्षकांनी उजळवलेल्या फ्लॅशलाइट्सने संपूर्ण पटांगण उजळून निघाले आणि नागपूरकर अक्षरशः ‘झिंगाट’ झाले.
अजय–अतुलची एन्ट्री आणि मैदानात उत्साहाचा स्फोट-
भव्य कोरस गीत ‘जय जय सुरवर पूजीत’ने कार्यक्रमाची सुरूवात झाली. ‘नटरंग उभा’ लागताच चाहत्यांचा जल्लोष वाढला आणि अजय–अतुलची मंचावर दमदार एन्ट्री होताच पटांगण दणाणून गेले.
“नागपूरचं प्रेम आम्हाला सतत नवं काम करण्याची प्रेरणा देतं,” असे सांगत त्यांनी 2009 मधील पहिल्या कॉन्सर्टची आठवण काढली.
शिवरायांना वंदन आणि भक्तिरसाने भारलेले क्षण-
‘इंद्र जिमि जंभ पर’ने वातावरणात गगनभेदी उत्साह उसळला.मल्हार वारी, उधे ग अंबे उधे, देवी आरती – आई भवानी अशा भक्तिरसपूर्ण गीतांनी संपूर्ण पटांगण भक्तिभाव, संगीत आणि रोमांचाच्या सुरेल लहरींनी न्हाऊन निघाले.मनीष आणि निहिराच्या ‘जीव दंगला’ने रंग खुलला.ऋषिकेश रानडे यांनी ‘अभी मुझमें कहीं’, ‘मेरे नाम तू’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ यांनी मन जिंकले.नागपूरची कन्या शरयू दाते आणि अजय यांनी ‘धड़क है ना’ सादर करत संध्याकाळ ऊर्जावान केली.अजय–अतुलची सुपरहिट गाणी — खेळ मांडला, वाजले की बारा, अप्सरा, अंबाबाईचा गोंधळ, आताचं बया का याडं लागलं, सैराट झालं जी, झिंगाट — लागल्यावर नागपूरकर अक्षरशः वेडे झाले.मोबाईल फ्लॅशलाइट्सची लाट, घोषणांचा आवाज आणि उसळता उत्साह… समारोप भव्य, अनोखा आणि अविस्मरणीय ठरला.
मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक सुरुवात-
समारोपाला केंद्रीय मंत्री आणि महोत्सवाचे प्रणेते मा. नितीन गडकरी, हुंडई इंडिया चे जिओजीक ली, आमदार सुमित वानखेडे, समीर कुणावर, माजी खासदार अजय संचेती, सुनील मेंढे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन बाळ कुलकर्णी आणि रेणुका देशकर यांनी केले. प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्वाखालील समितीतील सर्व सदस्यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी उल्लेखनीय मेहनत घेतली.
अरिजित सिंगला नागपूरात आणण्याचा प्रयत्न करू- नितीन गडकरी
गडकरी म्हणाले,या मंचावर श्रेया घोषाल, अजय-अतुल, शंकर महादेवन आले. पुढील वर्षी तरुणाईचा आवडता गायक अरिजित सिंगलाही आणण्याचा प्रयत्न करू.प्रेक्षकांनी टाळ्यांचा आणि घोषणांचा कडकडाट करत त्यांच्या घोषणेचे स्वागत केले.श्रेया घोषाल यांच्या कार्यक्रमात अनेकांना आत घेता न आल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि महोत्सव आता आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळाल्याचे सांगितले.










