
मुंबई : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहावा, यासाठी आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेत दरमहा ₹१,५०० रुपये थेट खात्यात जमा केले जातात, मात्र हा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया आता अनिवार्य ठरवण्यात आली आहे.
राज्यभरातील अनेक लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही अजूनही बाकी आहेत. त्यामुळेच सरकारने आता स्पष्ट केले आहे की, १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सर्व लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्ते रोखले जाण्याची शक्यता आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि महिलांना नियमित लाभ मिळावा म्हणून ई-केवायसी सुविधा सुरू करण्यात आली आहे. बहुतांश लाभार्थींनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून उर्वरित भगिनींनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी.”
राज्य सरकारकडून विकसित करण्यात आलेल्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर लाभार्थी सहजपणे ई-केवायसी करू शकतात. या वेबसाइटवरून प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करण्याची सोय उपलब्ध आहे.
ई-केवायसी करण्याची प्रक्रिया –
संकेतस्थळावर जा आणि “E-KYC” बॅनरवर क्लिक करा.
आधार क्रमांक आणि Captcha कोड भरून “Send OTP” वर क्लिक करा.
मोबाईलवर प्राप्त झालेला OTP भरून “Submit” करा.
प्रणाली तुमची KYC आधी पूर्ण आहे का, हे तपासेल.
नसल्यास पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरून OTP पडताळणी करा.
जात प्रवर्ग निवडून दिलेल्या घोषणांवर टिक करून “Submit” करा.
शेवटी “Success – तुमची e-KYC पडताळणी पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
अनेक महिलांना OTP येण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले होते. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, या समस्या दूर करण्यासाठी विभाग पावले उचलत आहे.








