Published On : Wed, Aug 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

राज्यात मांसबंदीवरून वाद पेटला; ठाकरे-पवार आक्रमक, फडणवीसांची भूमिका काय?


मुंबई :स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिकेने (केडीएमसी) १५ ऑगस्ट रोजी सर्व मांस दुकाने व कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर राज्यात नवा वाद उद्भवला आहे. या निर्णयाला विरोधी पक्ष तसेच अनेक स्थानिक संघटनांचा तीव्र विरोध होत असून, प्रकरण आता राजकीय रंग घेऊ लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांसह अनेक नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हा निर्णय थेट वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे.

केडीएमसीचे स्पष्टीकरण
अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सांगितले की, आदेश मांस खाण्यावर नाही तर विक्री आणि प्राण्यांच्या कत्तलीवर आहे. इच्छुकांना मांस खाण्यास कोणतीही मज्जाव नाही. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या म्हणण्यानुसार, ही प्रथा सुमारे १५ वर्षांपासून सुरू आहे. मात्र, जनतेचा विरोध लक्षात घेऊन याबाबत पुनर्विचार केला जाऊ शकतो.

राज्य सरकारची भूमिका
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के.एच. गोविंदराज यांनी भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की स्वातंत्र्यदिनी मांसबंदीबाबत राज्यस्तरीय आदेश नाही; स्थानिक पातळीवर महापालिका किंवा नगरपालिका स्वतंत्रपणे निर्णय घेतात.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अजित पवारांचा आक्षेप-
अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “धार्मिक सणांच्या वेळी मांसबंदी समजू शकतो; पण स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनी अशी अट घालणे योग्य नाही.” त्यांनी महाराष्ट्रातील विविध खाद्यसंस्कृतींचा उल्लेख करत मांसाहार हा अनेक समाजांच्या परंपरेचा भाग असल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरे यांचा हल्ला
आदित्य ठाकरे यांनी केडीएमसी आयुक्तांच्या निलंबनाची मागणी केली. ते म्हणाले, “स्वातंत्र्यदिनी काय खावे हे ठरवण्याचा अधिकार आमचा आहे. माझ्या घरी नवरात्रीतही प्रसादात मासे आणि कोळंबी असते, हेच आमचे हिंदुत्व आहे.”

विरोधी नेत्यांच्या घोषणा-
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी १५ ऑगस्टला डोंबिवलीत प्रत्यक्ष मटण खाण्याची घोषणा केली. तर मनसेचे माजी आमदार प्रमोद पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला की, “ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबईत बंदी नाही, मग केएफसी-मॅकडोनाल्डसारखी मांसाहारी रेस्टॉरंट्सही बंद राहणार का?”

संघटनांचा इशारा-
हिंदू खटिक समाजाने आदेश मागे न घेतल्यास १५ ऑगस्ट रोजी केडीएमसी कार्यालयाबाहेर प्रतीकात्मक मांस दुकान लावून निषेध करण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement
Advertisement