नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदारवाढीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पाच महिने आधी ८ टक्के मतदार वाढ झाली, तसेच अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी “झूट बोले कौवा काटे, काले कौवे से डरिये” ही हिंदी म्हण उद्धृत करत राहुल गांधींवर निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव होत असल्याने राहुल गांधींची निराशा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ते कोणतेही पुरावे न देता हवेत बाण सोडत आहेत.”
मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, “फक्त माझ्याच मतदारसंघात नाही, तर महाराष्ट्रातील २५ विधानसभा मतदारसंघांत लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान सरासरी ८% मतदार वाढ झाली आहे. माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघालगतच्या पश्चिम नागपूर व उत्तर नागपूर या मतदारसंघातही ७% मतदार वाढ झाली असून, या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे मतदारवाढ ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे, असे फडणवीस यांनी अधोरेखित केले.
राहुल गांधी यांना सल्ला देताना फडणवीस म्हणाले, ट्विट करण्याआधी आपण आपल्या पक्षातील स्थानिक नेत्यांशी संवाद साधला असता, तर अशी माहिती त्यांना मिळाली असती आणि इतका गैरसमज झाला नसता.