मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तब्बल ७६ लाख मतांची आकस्मिक भर पडल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. यावरून निवडणूक आयोगाची विश्वासार्हता आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे चेतन अहिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सोमवारी या प्रकरणावर सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांतर्फे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद सादर केला. सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून घेतले असून, या प्रकरणाचा निकाल २५ जून रोजी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या अभावावर टीका करत, १६ जानेवारी २०२५ रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून ईव्हीएम वापराविरोधात संयुक्त लढ्याचे आवाहन केले होते. मात्र, कोणत्याही पक्षाकडून याला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला.
या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून, २५ जूनच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.