बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाने आयपीएल २०२५ चं विजेतेपद पटकावत आपल्या दीर्घ १८ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम दिला. हा ऐतिहासिक क्षण केवळ संघासाठी नव्हे, तर संपूर्ण बंगळूरु आणि कोट्यवधी आरसीबी समर्थकांसाठी गर्वाचा आणि आनंदाचा आहे. या खास निमित्ताने शहरात विजय मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
कोहलीची भावुक प्रतिक्रिया –
या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं, “मी १८ वर्षं या क्षणाची वाट पाहत होतो. जेव्हा कुणीतरी मला बंगळूरुच्या आकाशात फटाक्यांचे व्हिडिओ दाखवले, तेव्हा माझं मन हरखून गेलं. आता उद्याच्या विजय परेडचीच सर्वाधिक उत्सुकता आहे. त्यामुळे मला झोप लागणं अशक्य आहे.
विराटने आरसीबीच्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले आणि हा विजय त्यांच्या निष्ठेमुळेच शक्य झाल्याचं नमूद केलं. त्याच्या बोलण्यातून संघाबद्दलचा अभिमान आणि चाहत्यांविषयीचं प्रेम ठळकपणे दिसून आलं.
विजय मिरवणुकीचं नियोजन-
आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर, ४ जून रोजी बंगळूरु शहरात भव्य विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात साजरा होणारा हा सोहळा केवळ ट्रॉफी जिंकल्याचा उत्सव नाही, तर तो अनेक वर्षांच्या समर्पणाचा आणि समर्थनाचा गौरव आहे.
परेडचं वेळापत्रक:
दुपारी १:३० वाजता – RCB संघाचे विमानतळावर आगमन
दुपारी ४:०० वाजता – मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सदिच्छा भेट
संध्याकाळी ५:०० वाजता – विधानसौध ते एम. चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत खुल्या बसद्वारे विजय रॅली
ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून जाणार असून, हजारो चाहते आपले हिरो आणि चॅम्पियन संघाचे स्वागत करण्यासाठी रस्त्यांवर उतरणार आहेत.
आरसीबीचा विजय , एका शहराच्या भावनेचं प्रतीक
आरसीबीचं हे यश केवळ एका स्पर्धेतील यश नाही, तर शहराच्या प्रत्येक रहिवाश्याच्या भावना, संघर्ष आणि अपार श्रद्धेचं प्रतिक आहे. ही ट्रॉफी कोहलीसाठी खास आहे, पण त्याहून अधिक ती प्रत्येक आरसीबी चाहत्याच्या हृदयात जपलेली आशा पूर्ण करणारी आहे.