नागपूर: केंद्र सरकारने ‘हिट ॲण्ड रन’ कायद्याची तूर्तास अंमलबजावणी होणार नाही, असा निर्णय जाहीर केल्यानंतर ट्रक चालकांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागपुरात ठिकठिकाणी काल मध्यरात्रीपासूनच ट्रकचालकांनी आंदोलन सुरू केले. परिणामी, विदर्भातील १५ हजारांवर ट्रकची चाके थांबली. या आंदोलनामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालवाहतुकीच्या पुरवठ्यासंदर्भात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशभरात नागपुरातून हजारो ट्रक विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी रेलचेल करतात. दरम्यान, नागपुरातील अनेक ट्रांसपोर्ट कंपनीतील चालकांनी कायद्याला विरोध करत सेवेवर येण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवारी रात्री व रविवारी मालवाहतूक झालीच नाही.
दरम्यान महत्त्वाचे म्हणजे या आंदोलनात तूर्तास स्कूलबस आणि रुग्णवाहिकांचे चालक सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे सध्या नागपूरसह विदर्भात स्कूलबस आणि रुग्णवाहिकेच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलसह इंधन टँकरची वाहतूक करणाऱ्या चालकांनीही मंगळवारी रात्रीपर्यंत सेवा सुरू ठेवली. परंतु बुधवारी ट्रकचालकांचा संप बघून तेही आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती आहे.