नागपूर : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नागपुरात एकाच दिवशी दिवसाढवळ्या चार लोकांची हत्या करण्यात आली, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरचेच आहेत.
नागपूर शहरात कायदा सुव्यवस्थेची ही स्थिती आहे तर राज्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. सरकार तरुणांना नोकऱ्या देत नाही आणि दुसरीकडे ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून तरुणांना बरबाद केले जात असल्याचा घणाघात पटोले यांनी केला. देशातील सर्वात महाग वीज महाराष्ट्रात आहे. सत्तेत बसलेले लोक फक्त मलाई खाण्यावर लक्ष देत आहेत. राज्यातील जनतेच्या मुळ प्रश्नावर सरकारने चुप्पी साधली आहे.
दरम्यान अधिवेशनाला सोमवार व मंगळवारी सुट्टी देण्यात आली आहे. यावरूनही पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत म्हणून तर दोन दिवस सभागृहाचे कामकाज बंद ठेवले नाही ना ? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.