Published On : Fri, Apr 13th, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दलित वस्तीत 100 टक्के विद्युतीकरण

Advertisement


नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलीत बहुल गावात 100 टक्के विद्युतीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. राज्यभरातील 192 गावांत हे अभियान राबविण्यात येणार असून यात विदर्भातील सर्वाधिक 140 गावांचा समावेश आहे.

राज्यातील ज्या गावात 80 टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा 192 गावात 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असून यात विदर्भातील 140 गावांचा समावेश आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबीर लावण्यात येणार असून या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे अशा ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरली तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या अभियाना अंतर्गत अकोला जिल्ह्यातील 34, बुलढाणा जिल्ह्यातील 22. वाशिम जिल्ह्यातील 15, अमरावती 25, यवतमाळ 13, चंद्रपूर 7, गडचिरोली जिल्ह्यातील 8 गावांतील 100 टक्के घरांना वीज जोडणी देण्यात येणार असून भंडारा जिल्ह्यातील 7, गोंदीया जिल्ह्यातील 3, वर्धा जिल्ह्यातील 2 तर नागपूर जिल्ह्यातील 4 गावांमध्येही या अभियाना अंतर्गत सौभाग्य योजनेतील तरतुदींप्रमाणे 100 टक्के वीज जोडणी दिल्या जाणार आहे.

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उदिष्ट्य असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि. 14 एप्रिल ते 05 मे 2018 या दरम्यान संपूर्ण राज्यात ‘ग्रामस्वराज्य’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये राज्यातील ज्या गावात दलितांची संख्या 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे व गरीब कुटुंबांचे प्रमाणही जास्त आहे अशा गावात सौभाग्य योजनेतून वीज नसलेल्या सर्व कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी अशा सर्व 192 गावात मोठया संख्येत शिबीर लावण्यात येणार आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी होऊन, सौभाग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.