Published On : Sun, Apr 12th, 2020

संपूर्ण सहकार्य केल्यास टाळेबंदी पुन्हा वाढवावी लागणार नाही’- अजित पवार

Advertisement

अजित पवारांनी ‘ईस्टर संडे’च्या दिल्या शुभेच्छा; घरातच थांबण्याचे केले आवाहन

मुंबई दि.११ एप्रिल – कोरोनाच्या संकटामुळे ‘ईस्टर संडे’ची प्रार्थना आपापल्या घरात करावी… कुणीही घराबाहेर पडू नये… घरात रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ईस्टर संडे’निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून भगवान येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा दिवस आपल्या जीवनात आनंद घेऊन येईल. मानवतेच्या सेवेसाठी प्रेरीत करेल असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

‘ईस्टर संडे’ म्हणजेच ‘पुनरुत्थान दिन’… भगवान येशू ख्रिस्त हे ‘ईस्टर संडे’ दिवशी मृत्यूवर मात करुन पुनरुत्थित झाले होते. यानिमित्ताने त्यांचे स्मरण करत असताना आपणही ‘कोरोना’वर मात करण्याचा निर्धार करुया. भगवान येशू ख्रिस्तांच्या दया, प्रेम, क्षमा, शांती आणि मानवतेच्या सेवेची शिकवण अंगिकारण्याचा प्रयत्न करुया. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ईस्टर संडे’निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

30 एप्रिलपर्यंत सर्वांनी सहकार्य केल्यास,
पुन्हा टाळेबंदी वाढवावी लागणार नाही…

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यातली टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे सांगून नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे.

आपला व आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सरकारने टाळेबंदी वाढवली आहे. लोकहितासाठी घेतलेल्या ३० एप्रिलपर्यंतच्या टाळेबंदीला राज्यातील जनतेने सहकार्य करावे. प्रत्येकाने घरातंच थांबावे, डॉक्टर, पोलिस, शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे. ही टाळेबंदी यशस्वी झाली तर कदाचित पुन्हा टाळेबंदी वाढवावी लागणार नाही याचा विचार करुन राज्यातल्या प्रत्येकानेच कोरानावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.