मुंबई : बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला खून करण्यात आला. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप सर्व स्तरावरून करण्यात येत होता.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र आज 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड याने पूण्यातील सीआयडीच्या कार्यालयात सरेंडर केले. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने अतिशय गतिशील तपास केलेला आहे.
त्यामुळेच आज वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतले जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्याकरता वेगवेगळ्या टीम्स कामी लागलेल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.