कामठी:-जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून शेकडो जीव या महामारीच्या कचाट्यात सापलेले आहेत. सध्या कुठलीही औषध यावर नसली तरी खबरदारी म्हणून शासन, प्रशासना तर्फे जनतेला घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
या महामारी विषयी दक्षता आणि जनजागृती म्हणून कामठी तालुक्यातील आजनी गावात सुध्दा ग्राम पंचायत आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सुरक्षितता ठेवून विशेष उपक्रम राबविले जात आहेत.
गावात आतापर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा ठाकरे याने दोनदा फॉगिंग मशीनचा धूर केलेला असून औषधी फवारणी सुध्दा करण्यात आलेली आहे. ग्राम पंचायतच्या माध्यमातून संपूर्ण गावकऱ्यांना सदस्य संख्येनुसार ग्रामपंचायत कर्मचारी भिमराव नागोसे व योगराज नागापुरे हे मास्कचे वाटप करीत आहेत.
परगावाहून आलेल्या लोकांची गावातील आरोग्य केंद्रातर्फे तपासणी करण्यात आलेली आहे. गावाच्या सीमा बंद करत इतरांनी गावात शिरू नये यासाठी गाव रस्त्यावर आडकाठी करण्यात आलेली आहे. गावातील चौक आणि किराणा दुकानांत गर्दी जमू नये म्हणून सभापती उमेशभाऊ रडके जातीने लक्ष घालत आहेत.गावात सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास सुध्दा पाबंदी लावण्यात आलेली आहे.
तसेच गावात वेळोवेळी पोलिसांची गस्त घालण्यात येत आहे.
करोनाच्या जनजागृती आणि दक्षतेसाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत तसेच सरपंच, सचिव, सदस्य आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.