Published On : Sat, Apr 11th, 2020

नागपुरातील आणखी तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

Advertisement

नागपूर : नागपूर Nagpur शहरासाठी मोठी दिलासादायक व सकारात्मक बाब शनिवारी (ता.११) दिसून आली. शहरातील आणखी तीन रुग्ण Three patients कोरोनामुक्त Corona झाले आहेत. दिल्लीवरून आलेल्या कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले त्याच्या परिवारातील तीन कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. या तीन रुग्णांमध्ये दोन महिला व एका मुलाचा समावेश आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनातर्फे तीनही रुग्णांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले.

शुक्रवार (१०) एप्रिलपासून कोरोनासंदर्भात नागपूर शहराकरिता दिलासादायक माहिती मिळत आहे. शुक्रवारी येथील ४२ वर्षीय व्यक्तीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनातर्फे सुटी देण्यात आली. याच व्यक्तीच्या संपर्कात आलेले त्यांची ५९ वर्षीय आई, ३४ वर्षीय पत्नी आणि १४ वर्षीय मुलगा कोरोनामुक्त झाले आहेत.

१७ मार्च रोजी दिल्ली येथून परतलेल्या येथील ४२ वर्षीय व्यक्तीची २६ मार्च रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. खबरदारी म्हणून या व्यक्तीच्या परिवारातील सर्व सदस्यांची २६ मार्च रोजी कोरोना चाचणी घेण्यात आली. २७ मार्चला सदर रुग्णाची ५९ वर्षीय आई, ३४ वर्षीय पत्नी आणि १४ वर्षीय मुलाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्वरित तीनही रुग्णांना रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये भर्ती करून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ‘स्वॅब’ घेण्यात आले. त्यांच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना शनिवारी (ता.११) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

दरम्यान, तीनही रुग्णांनी उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच रुग्णालयातील अन्य सर्व कर्मचा-यांचे आभार मानले. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनातर्फे तातडीने आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात आली, त्याबद्दलही त्यांनी आभार मानले. कोरोनामुळे कुणीही घाबरून जाऊ नये. प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, त्यांचे सर्वांनी पालन करावे. कुणीही घराबाहेर पडू नये, नियमित स्वच्छता पाळावी. ताप, सर्दी, घसादुखी, श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता तातडीने उपचार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.