Published On : Wed, Jul 29th, 2020

कोव्हिडच्या अनुषंगाने महापौरांनी मागितल्या स्वयंसेवी संस्थांकडून सूचना

Advertisement

– जनजागृती आणि आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी सहकार्य करण्याचा मानस

नागपूर: कोरोनाच्या संकटात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये प्रत्येकच स्वयंसेवी संस्थेने आपापल्यापरीने उत्तम सेवाकार्य बजावले. स्थलांतरीत मजूर, बेघरांना अन्न पुरविणे असो की श्रमिकांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक सहकार्य या सा-यातच शहरातील स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले. कोव्हिडच्या या संकटाच्या काळात पुढेही स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. यासंदर्भात शहरात काय करायला हवे आणि पुढे काय करायला हवे, यासंबंधी महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी (ता.२९) शहरातील स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधला. यावेळी कोव्हिडच्या अनुषंगाने आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी मागितल्या.

रवीनगर येथील अग्रसेन छात्रावासच्या परिसरात महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी,अनील अहिरकर, अग्रसेन छात्रावासच्या अध्यक्ष उर्मीलादेवी अग्रवाल, सचिव कैलास जोगानी आदी उपस्थित होते.

यावेळी सुमारे ८४ संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभागी होउन आपल्या सूचना मांडल्या. परिसरात गर्दी होउ नये यासाठी संस्थांच्या प्रतिनिधींना ठराविक वेळ देउन त्याच वेळेत संवाद साधण्यात आला. यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, आज शहरात ४५००च्या जवळपास कोव्हिडची रुग्ण संख्या झालेली आहे. दररोज नवनवीन भागातील रुग्ण निघत असल्याने शहरात प्रतिबंधित क्षेत्रही वाढत आहेत. शहरात वाढती रुग्णसंख्या पाहता लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर आता घरीच उपचार केले जाणार आहेत. या संपूर्ण बाबींमध्ये मनपाला वैद्यकीय आणि इतर बाबतीत अनेक अडचणी येणार आहेत. यावर काय उपाययोजना करता येउ शकतात व स्वयंसेवी संस्था काय भूमिका बजावू शकतील, यासंबंधी संस्थांनी आपली भूमिका आणि सूचना मांडण्याचे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.

प्रारंभी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सुरूवातीच्या लॉकडाउनच्या काळात स्वयंसेवी संस्थांनी केलेले सहकार्य, बेघर निवारा केंद्रातील मदत या सर्वांसाठी स्वयंसेवी संस्थांचे आभार मानले. पुढील काळात मनपाच्या प्रशासकीय कार्यात आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केली.

शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिका सातत्याने कार्य करीत आहे. या कोव्हिडच्या संकटकाळात सर्वच यंत्रणा निरंतर कार्य करीत आहे. या कार्यात शहरातील एक संस्था आणि आपले कर्तव्य म्हणून प्रत्येकच संघटनेने आपली जबाबदारी पार पाडली. शहराप्रती आपले कर्तव्य म्हणून पुढेही मनपाला आवश्यक ते सहकार्य करण्यास प्रत्येक संघटना तयार असल्याचे मत स्वयंसेवी संस्थांद्वारे संयुक्तपणे व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी नागपूर रेसिडेन्सिएल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी व सुरभी जायस्वाल, जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर, नारीशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती तिवारी, वनराईचे सदस्य तथा वृक्ष संवर्धन समितीचे बाबा देशपांडे, क्रीडाक्षेत्रात कार्य करणारे अतुल दुरूगकर, पीओपी मूर्ती विरोधी संस्थेचे सुरेश पाठक, नागपूर चेम्बर ऑफ कॉमर्सचे कैलास जोगानी व महेंद्र कटारीया, जागनाथ रोड असोसिएशन मध्य नागपूरचे अध्यक्ष रितेश मोदी, अनील अहिरकर, लोककल्याण समितीचे माधव राणे, सुप्रिया चिकतपुरे, लॉयन्स क्लबचे भरत पारेख, अखिल भारतीय प्रजापती समाज समितीचे चंदन प्रजापती, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी व सुरभी जायस्वाल, भारतीय जैन संस्थेचे सचिन कोठारी, महावीर इंटरनॅशनलचे भगत पारेख, एनबीसीसीचे हर्षल मेहाडिया, मी टू बी फाउंडेशनचे चेतन मारवाह, ‘टुगेदर वी फ्रॉम’संस्थेचे वासुदेव मिश्रा, अखंड भारत विचारमंच चे मनोज सिंग, आयएमए च्या डॉ.अर्चना कोठारी, समर्पण सेवा समिती, जनमंचचे अध्यक्ष राजू जगताप, राम आकरे, इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनचे अशोक वाधवानी, सारथी ट्रस्टच्या विद्या कांबळे, पतंजली योग समितीच्या शोभा भागिया आदी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत आपल्या सूचना मांडल्या.