Published On : Fri, Jan 14th, 2022

सोशल मिडिया साक्षरतेने नगरसेवकांपुढे आव्हान : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

मनपा निवडणुकीत वाढणार अडचणी. भूमीपूजनाचे फोटो ‘अपलोड’, प्रत्यक्ष कामच नाही.

नागपूर: महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांनी सोशल मिडियावर भूमीपूजनाचे फोटो अपलोड करून नागरिकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. परंतु प्रत्यक्षात कामच झाले नसल्याचे नागरिकांच्या लक्षात येत असल्याने नगरसेवकांवर त्यांचीच ‘पोस्ट’ बूमरॅंग होताना दिसून येत आहे. नागरिक आता कामाबाबत नगरसेवकांच्या घरी किंवा जनसंपर्क कार्यालयात जात नसून थेट पोस्ट’वर व्यक्त होऊन संतापाला वाट’मोकळी करून देत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षभरात मनपातील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी भूमीपूजनाचा धडाका सुरू केला. लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरी असतानाही काही नगरसेवकांनी कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विकास कामांचे भूमीपूजन केले. या भूमीपूजनाचे फोटो त्यांनी फेसबुक, इन्स्टाग्रामवर ‘शेअर’ करून घरी बसलेल्या नागरिकांनाही आकर्षित केले. याच लॉकडाऊनमुळे अबालवृद्धापर्यंत सारेच सोशल मिडिया साक्षर झाल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकही सोशल मिडियावर खाते सुरू करून नेमके काय चालले याचा आढावा घेताना दिसत आहे.

लॉकडाऊनचे निर्बंध हटविल्यानंतर नागरिक बाहेर आले. परंतु नगरसेवकांंनी भूमीपूजनाचे फोटो टाकलेली कामे प्रत्यक्षात सुरूच झाली नाही किंवा कामच झाले नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. परिणामी आता नागरिकांनीच नगरसेवकांंना त्यांच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया देणे सुरू केले. एवढेच नव्हे काही नागरिकांनी सोशल मिडियावर मोठे पाठबळ मिळत असल्याने नगरसेवकांच्या पोस्टचे स्क्रिनशॉट काढून स्वतःच्या अकाऊंटवर अपलोड करून संतप्त प्रश्न विचारले.

याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीत मतपेटीवर होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांनी झालेल्या कामाचे फोटो कधीच अपलोड केले नाही. त्यामुळे सोशल मिडियातून नगरसेवक मूर्ख बनवित असल्याची भावना सोशल मिडिया वापरकर्त्यांत तयार झाल्याचे पारसे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकच आता सोशल मिडियातून नगरसेवकांविरोधात एकत्र आल्याचे दिसून येत आहे. काही नगरसेवकांनी कोरोनाचे अपडेट आकडे टाकून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम सुरू केले. मुळात नगरसेवक व नागरिक यांच्यात दुतर्फी संवादाची गरज असताना ते दिसून येत नाही. महापालिका निवडणुकीसाठी अजून दीड दोन महिने वेळ असून याकाळात नगरसेवकांनी प्रत्यक्ष केलेल्या कामांचा उहापोह करण्याचे टाळल्यास नगरसेवकच तोंडघशी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे चित्र आहे.

सोशल मिडियावरून आता कुणालाही मुर्ख बनविता येत नाही. नगरसेवकांनी खरेच कामे केली असेल तर त्याचे फोटो नव्हे तर व्हीडीओ अपलोड केल्यास वास्तव पुढे येईल व त्यांची विश्वासार्हताही कायम राहील. अन्यथा यापुढे पक्षांविरोधात पक्ष नव्हे तर विविध पक्षांविरोधात नागरिक असे चित्र सोशल मिडियावर दिसल्यास आश्चर्य वाटू नये. नगरसेवक व इच्छुकांनीही वास्तवतेवर भर देण्याची गरज आहे.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.webnagpur.com