Published On : Sun, May 24th, 2020

लेखा आणि वित्त विभागातील गैरहजर कर्मचाऱ्यांना ‘‘कारणे दाखवा’’ नोटीस

Advertisement

कार्यालयातील 33 टक्के उपस्थिती आदेशाला हरताळ

नागपूर: राज्य शासनाने कार्यालयातील अनियंत्रित गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली असून प्रत्येक शासकीय कार्यालयातील कामकाज 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अथवा आवश्यक काळात दोन पाळीत सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, नागपूर महानगर पालिका प्रशासन राज्याच्या आदेशाला हरताळ फासत असल्याचे जाणवत आहे. उपराजधानी सध्या ‘रेड झोनमध्ये’ असताना मनपा प्रशासनाने लेखा व वित्त विभाग कार्यालयात कर्मचा ऱ्यांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. कार्यालयात वैयक्तिक कारणास्तव अनुपस्थित राहणाऱ्या आणि कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभागाच्या अधिकारी मोना ठाकुर यांच्यातर्फे अलीकडेच ‘‘कारणे दाखवा’’ असा नोटीस बजावण्यात आली आहे. समाधानकारक कारण न देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

लेखा व वित्त विभागातील एका कर्मचाऱ्यांने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर मनपा प्रशासन स्थानिक कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे कसे दुर्लक्ष करत आहे, याचा पाढाच वाचला. शहरात कोरोनाचा धोका वाढत असल्याने विभागात किमान कर्मचारी असणे आवश्यक आहे. 100 टक्के उपस्थितीमुळे विषाणूंचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासन 33 टक्के कर्मचा ऱ्यांच्या उपस्थितीत कामे करा असे सांगत असताना मनपा प्रशासन त्यांच्या कर्मचा ऱ्यांवर 100 टक्के उपस्थितीची अट का लादत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मनपा कार्यालयातील सुरक्षा रक्षक नावापुरतेच

नागपूर मनपाच्या लेखा आणि वित्त विभागात दिवभरात 50-60 कंत्राटदार दररोज भेट देतात. यापैकी बहुसंख्य कंत्राटदार बिनकामाच्या व्यक्तींना सोबत आणतात. बहुतेक कंत्राटदार ‘रेड झोन’ भागातील रहिवासी असल्याने मनपा कार्यालयात कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती स्थानिक कर्मचा ऱ्यांमध्ये पसरली आहे. कोरोना परिस्थितीत अत्यावश्यक काम असलेल्या व्यक्तींनाच विभागात येण्याची परवानगी असावी. परंतु, मास्क न वापरता 20-30 जण नियम धाब्यावर बसवून सरसकट कर्मचा ऱ्यांच्या टेबलपर्यंत पोहोचतात. फाईल्स अटकून पडल्या असल्याने कर्मचा ऱ्यांशी हुज्जत घालतात. यामुळे कंत्राटदारांना समजाविण्यात कर्मचा ऱ्यांचा अर्धा वेळ वाया जातो. कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर लटकत असतानाही 100 टक्के उपस्थितीत काम करावे की, बाह्य व्यक्तींची समजूत काढावी अशा दुहेरी पेचात कर्मचारी अडकले आहेत. बाह्य व्यक्ती कार्यालयात थेट प्रवेश करू नये, यासाठी द्वारावर सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे. मात्र, मनपा प्रशासनाला अद्यापही याबाबत जाग आली नसल्याने येथील कर्मचा ऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यालयात सॅनिटायजर किंवा मास्कची सोय नसल्याने काही कर्मचा ऱ्यांनी सरसकट नाराजी व्यक्त केली. प्रत्येक विभागातील कर्मचा ऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षा जोपासली जावी, याकरिता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी मनपा कर्मचारी करीत आहे.