Published On : Mon, Mar 30th, 2020

दहा हजाराहून अधिक विस्थापितांची सोय

Advertisement

लॉकडाऊनमुळे बेघर-विस्थापित नागरिकांसाठी नागपूर विभागात 121 निवारागृहे सुरू- डॉ संजीव कुमार

नागपूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात 121 निवारागृहे (शेल्टर होम) सुरू करण्यात आली आहेत, या निवारागृहात 10 हजार 339 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, यासाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी आज अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत,

विभागात नागपूर – 73 निवारागृहे ( 8 हजार 179 नागरिकांची सुविधा), वर्धा जिल्हा – 7 निवारागृहे ( 240 नागरिक) भंडारा जिल्हा- 9 ( 57 नागरिक) गोंदिया जिल्हा- 8 (836 नागरिक) चंद्रपूर जिल्हा – 15 ( 652 नागरिक) व गडचिरोली जिल्हा – 9 ( 375 नागरिक) अशा पध्दतीने एकूण 10 हजार 339 विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था करण्यात आली आहे.

बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैधकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ संजय कुमार यांनी दिली.

जमावबंदो व लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांनी सध्याच्या ठिकाणीच थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहातच रहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये असे आवाहन करतानाच विभागात विस्थापिताच्या मागणीनुसार अजून शेल्टर होम सुरू करण्यात येतील असेही विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी कळवले आहे.