Published On : Thu, Oct 12th, 2017

नांदेडचा निकाल भाजपची लाट ओसरल्याची नांदी – नवाब मलिक

Advertisement

मुंबई: नांदेड महानगरपालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्यामुळे भाजपची लाट आता पुर्णपणे ओसरली आहे. देशात कमळ, राज्यात कमळ, मनपात कमळ, असे भाजपचे घोषवाक्य ठरले होते. हा भ्रम नांदडेच्या जनतेने धुळीस मिळवल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नांदेडच्या विजयाबद्दल त्यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले. तसेच नांदेडच्या जनतेचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अॅड. अमोल मातेले, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आणि क्लाईड क्रास्टो

‘पार्टी विथ डिफरन्स’ असा टेंभा मिरवणाऱ्या भाजपने नांदेड मनपाच्या निवडणूकीत सर्व नैतिकता बाजुला ठेवून, पैसा, शक्ती पणाला लावली होती. लोहा कंधारचे शिवसेना आमदार चिखलीकर हे भाजपच्या प्रचाराचे प्रमुख झाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आमचेच जास्त सदस्य निवडूण आल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीतला जो आकडा भाजपने दिला तो फसवा होता. नांदेडच्या मतदानावर परिणाम व्हावा, म्हणून खोटे आकडे देण्यात आले. तरी नांदेडच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली.

रेल्वेमंत्री पियुष गोयल व कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांना मंत्रीपदावरून दूर करा – नवाब मलिक

द वायर या ऑनलाईन न्युज पोर्टलने बातमी दिल्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्या टेंपल इंटरप्रायजेस या कंपनीच्या वार्षिक उलाढालीत १६००० पटींनी वाढ झाली आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मात्र आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षाच्या मुलाने मंदिराच्या नावावर भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे.

माध्यमे जेव्हा एखाद्या कंपनीबाबत भ्रष्टाचाराची बातमी देतात, तेव्हा त्या कंपनीला खुलासा मागण्याचा अधिकार असतो. पण जय शहा यांच्या खाजगी कंपनीचा बचाव करण्यासाठी खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल समोर येत आहेत, याचाच अर्थ दाल मे कुछ काला असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. पीयूष गोयल हे रेल्वेमंत्री असण्याऐवजी जय शहा यांच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट असल्यासारखे बचाव करत आहेत.

जय शहा यांच्या टेम्पल इंटरप्रायजेस लिमिटेडमध्ये घोटाळा झाला असल्यास ते चौकशीअंती समोर येईल, परंतु पीयूष गोयल यांच्यासह कायदे मंत्री रविशंकर प्रसाद आणि सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल कंपनीचे बाजुने उभे राहिले आहेत. सरकारचे कायदा विषयक सल्लागार असतानाही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल जय शहा यांचा खटला लढत आहेत. सॉलिसिटर जनरलपदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

तसेच जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत रेल्वे व कायदे मंत्री यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहीजे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.

खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, जि.प. अध्यक्ष अशा जवळपास ३०० महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. देशभरात सध्या असलेले वातावरण व राज्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ ऑक्टोबर, रविवारी, सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलची बैठक आयोजित केली आहे. राज्यभरातून अनेक डॉक्टर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना जोडे मारो आंदोलन करणार – अॅड. अमोल मातेले

मुंबई विद्यापीठाने निकाल रखडवल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आतापर्यंत पाच आंदोलन केली असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी दिली. तसेच अनेकवेळा निवदेन देत परिक्षा शुल्क कमी करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला होता. तरिही कोणतीही उपाययोजना विद्यापीठाने केली नाही. त्यामुळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे मातेले यांनी सांगितले.

ज्या कंपनीने पेपर तपासणीचा घोळ केला त्या मोरिटट्रॅक कंपनीला पुन्हा पुढील वर्षांसाठी काम दिलेले आहे. आणखी काही कंपन्यांना पेपर तपासणीचे काम द्यावे, अशी मागणी मातेले यांनी केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे महानगरपालिकेसमोर आंदोलन – चित्रा वाघ

महानगरपालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उंदरांनी रूग्णांना चावे घेण्याचा अत्यंत वेदनादायी प्रकार घडला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाअध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आयुक्तांना उंदिर पकडण्याचा सापळा दिवाळी गिफ्ट म्हणून देऊन मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्याची मागणी करण्यात आली, अशी माहिती चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या आंदोलनावेळी गटनेत्या राखी जाधव, नगरसेविका आणि आरोग्य समितीच्या सदस्या सईदा खान, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

१३० कोटी रुपये खर्च करून शताब्दी रुग्णालयाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. सद्यस्थितीत उंदरांनीच हे १३० कोटी रुपये कुरतडले की काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खर्चाच्या तुलनेत रूग्णांची गैरसोय, डॉक्टर आणि कर्मचा-यांची अपुरी संख्या, वर्गांचा अभाव, भिंतींना गेलेले तडे, खराब झालेलं फ्लोरिंग अशी या रुग्णालयाची स्थिती आहे. या घटनेनंतरही प्रशासन ढिम्म असल्याचे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले. शताब्दी सारखीच इतर अनेक मनपाच्या रुग्णालयात अशीच परिस्थिती असून महापालिकेने त्याकडेही लक्ष द्यावे, याकडे चित्रा वाघ यांनी लक्ष वेधले.