Published On : Fri, Apr 6th, 2018

मोदींच्या भितीने उंदीर-मांजरं, सांप- मुंगूस मिळून निवडणूक लढवत आहेत : शहा

Advertisement


मुंबई: ‘राहुल गांधी हे भाजपच्या सरकारकडं साडेचार वर्षांचा हिशेब मागत आहेत. पण त्यांच्या चार पिढ्यांनी देशासाठी काय केलं,’ असा सवाल करतानाच, ‘राहुल बाबा हल्ली शरद पवारांना भेटतात. पवारांनी इंजेक्शन दिल्यानंतर ते बोलतात,’ असा घणाघात भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज केला.

भाजपच्या ३८व्या स्थापना दिनी मुंबईत आयोजित केलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते. शहा यांनी यावेळी भाजपची वाटचाल आणि केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची तुलना महापुराशी करत शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ‘महापूर आला की सगळी खुरटी झाडं, झुडपं मोडून पडतात. केवळ वटवृक्ष राहतो. मग पुराला घाबरलेले सगळे साप, मुंगूस, कुत्रे, मांजरी त्या वृक्षाचा आसरा घेतात. त्याचप्रमाणं, सगळे विरोधक आता मोदी नावाच्या महापुरापासून वाचण्यासाठी एकत्र आले आहेत,’ असं शहा म्हणाले.

असा अध्यक्ष मी पाहिला नव्हता!
राहुल गांधी यांच्यावर शहा यांनी चौफेर हल्ला चढवला. उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दोन जागांवर पराभव झाल्यामुळं राहुल बाबा प्रचंड खूष झाले होते. त्यांनी मिठाई वाटली. पण त्याच निवडणुकीत काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं होतं, हे ते विसरले. स्वत:च्या पक्षाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्यानंतरही मिठाई वाटणारा पहिलाच अध्यक्ष मी पाहिला,’ असा चिमटा शहा यांनी काढला.

आरक्षण सुरूच राहणार!
आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चालवलेल्या प्रचारालाही शहा यांनी उत्तर दिले. ‘मोदी सरकारनं एससी/एसटी अॅक्ट हटवल्याचा अपप्रचार केला जात आहे. पण असं काहीही होणार नाही. मोदी सरकार आरक्षणाला हात लावणार नाही आणि कोणाला लावूही देणार नाही,’ असं शहा यांनी स्पष्ट केलं.