Published On : Mon, Dec 23rd, 2019

तुमचं आंदोलन शांततेत करा… देशाच्या संपत्तीचे नुकसान करु नका- शरद पवार

Advertisement

एनआरसीबाबत भाजपाच्या दुटप्पी भूमिकेवर शरद पवारांनी डागली तोफ…

मुंबई : एनआरसी बाबत असलेली नाराजी मी समजू शकतो परंतु तुमचं आंदोलन शांततेत करा… देशाच्या संपत्तीचे नुकसान करु नका आणि कायदा हातात घेऊ नका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेला आज पत्रकार परिषदेतून केले.

सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी आज पत्रकार परिषद घेऊन एनआरसी बाबत भाजपाची नेमकी दुटप्पी भूमिका कशी जाहीर होत आहे हे स्पष्ट केले

पंतप्रधान यांनी दिल्लीतील एका सभेत मंत्रिमंडळ व संसदेत एनआरसीबाबत विरोध झाला नाही असे सांगितले हे चुकीचे आहे. संसदेत मी आणि आमचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एनआरसीबाबतचे दुष्परिणाम सांगितले होते. शिवाय राष्ट्रपती महोदयांनी दोन्ही सभागृहात अभिभाषणाच्यावेळी एनआरसी विषय सांगितला होता. राष्ट्रपती बोलतात ती सरकारची पॉलिसी ठरलेली असते तेच बोललं जातं. देशाचे गृहमंत्री एनआरसीचा निर्णय देशासाठी घेतल्याचे सभागृहात सांगतात आणि दुसरीकडे पंतप्रधान वेगळे बोलतात यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

सत्तेत बसलेल्या लोकांनी शांततेने पाऊले टाकायची असतात परंतु सध्याचे सरकार ज्यापध्दतीने धार्मिक अंतर ठेवण्याचा आणि एकतेला ठेच पोचेल अशी पाऊले टाकताना दिसत आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

एनआरसी विरोधात देशातील एक मोठा हिस्सा रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त करत आहे. परंतु हे आंदोलन शांततेत करा असे आवाहन शरद पवार यांनी केले.

दरम्यान येत्या दोन वर्षांत भाजपाला उतरती कळा लागली असून ती थांबण्यातील दिसत नाही अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

दरम्यान सर्वपक्षीय बैठका घेत राष्ट्रीय विषयांवर यापूर्वी चर्चा होत होती आता ते होत नाही याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी पत्रकारांनी एनआरसी, झारखंड निकाल आणि राज्यातील मंत्रीमंडळ स्थापनेबाबत शरद पवार यांना प्रश्न केले.