Published On : Fri, Apr 5th, 2019

निवडणुकीसंदर्भातील प्रचार साहित्य प्रमाणित करणे बंधनकारक -अश्विन मुदगल

Advertisement

नागपूर: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघातील उमेदवार तसेच पक्षासाठी प्रचार करताना सर्व प्रचार साहित्यासाठी जिल्हा माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीतर्फे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच सर्व बल्क एसएमएस पाठविण्यापूर्वी प्रमाणित करणे आवश्यक असून न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल. असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा एमसीएमसी समितीचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एमसीएमसी समितीची बैठक जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीत रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी व समितीचे सदस्य रविंद्र खजांजी, नोडल अधिकारी अनिल गडेकर, समितीचे सदस्य पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर, गौरी मराठे, सायबर तज्ज्ञ राकेश माखेजा, यशवंत मोहिते, ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे, मोईज हक, विजय करे, झाकीर पठाण आदी उपस्थित होते.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या जिल्हा एमसीएमसी समिती गठित करण्यात आली असून या समितीमार्फत मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच सर्व समाज माध्यमांवर निवडणुकीसंदर्भातील जाहिरातीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची प्रमाणीकरण करण्यात येते. या समितीमार्फत रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघातील जाहिरात, होर्डिंग्ज आदी मुद्रित माध्यमांच्या 36 उमेदवार प्रतिनिधी व पक्षांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमावरील 23 उमेदवारांच्या प्रचार साहित्यांना समितीमार्फत प्रमाणित करण्यात आले आहे.

विविध सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या पोस्टसुद्धा या समितीमार्फत प्रमाणित करणे आवश्यक आहे. त्यासोबतच वैयक्तिक अथवा बल्क स्वरुपाचे एसएमएस प्रमाणित करुनच पोस्ट करणे बंधनकारक असून सर्व उमेदवारांनी एसएमएस पाठविण्यापूर्वी या समित्यामार्फत प्रमाणित करुन घेण्याची सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

एसएमएस सर्व्हिस प्रोव्हाईड करणाऱ्या 117 कंपन्या आहेत. त्यापैकी पाच कंपन्या नागपूर व रामटेक परिसरात बल्क एसएमएसची सेवा देत असून या सर्व कंपन्यांनी जोपर्यंत एमसीएमसी समितीमार्फत प्रमाणित केल्याचे प्रमाणपत्र सादर करणार नाही तोपर्यंत उमेदवार अथवा राजकीय पक्ष एसएमएस स्वीकारु नये, अन्यथा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाईस पात्र ठरतील, असे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिले. यावेळी पेड न्यूज विविध माध्यमांद्वारे सुरु असलेला उमेदवार अथवा पक्षाचा प्रचार सोशल मीडियावरील विविध माध्यमाद्वारे होत असलेला प्रचार इलेक्ट्रॉनिक माध्यम, केबल टी. व्ही. यावरील प्रचारासंदर्भात आढावा घेवून प्रत्येक प्रचार साहित्य प्रमाणित झाले किंवा नाही यासंर्दभातही आढावा घेण्यात आला.