Published On : Fri, Jun 5th, 2020

वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण स्वच्छता महत्वाची – अजित पवार

Advertisement

जागतिक पर्यावरणदिनाच्या दिल्या शुभेच्छा…


मुंबई – कोरोनानंतरच्या काळात स्वच्छता, सुरक्षितता वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. त्यावेळी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातील जनतेला अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

संपूर्ण जग कोरोना संकटाशी लढत असताना पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धनाची गरज ठळकपणे जाणवते आहे. मानवी जीवनात निसर्गाचं आणि निसर्गातील वनं, वन्यप्राण्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे असेही अजित पवार म्हणाले.

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे निसर्गातील मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. परिणामस्वरुप ओढे, नाले, नद्या, पाण्याचे स्त्रोत, प्रवाह स्वच्छ झाले आहेत. हवेतील प्रदुषण कमी होऊन मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे. स्वच्छ वातावरण मनाला आनंद देत आहे. वन्यप्राण्यांचे दुर्मिळ दर्शन घडू लागले आहे. निसर्गाचे, पर्यावरणाचे हे स्वच्छ स्वरुप भविष्यात अधिक समृद्ध करायचे आहे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

आज किंवा उद्या कोरोनाचं संकट नक्की संपेल. त्यानंतर जेव्हा आपण घराबाहेर पडू त्यावेळी निसर्गाला, पर्यावरणाला नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वनं, वन्यप्राणी हे वैभव आहे त्याचे जतन केले पाहिजे अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.

कोरोनानंतरच्या काळात ओढे, नाले, नद्या, पाण्यांचे स्त्रोत, हवेत प्रदुषण होणार नाही याबाबत दक्ष राहिले पाहिजे. माणसाला जगण्यासाठी पर्यावरणाची किती गरज आहे हे अडीच महिन्याच्या टाळेबंदीच्या काळात अनुभवले आहे. यातून बोध घेऊन आपण आजचा जागतिक पर्यावरण दिन साजरा करुया. पर्यावरण संरक्षण,संवर्धनासाठी कटीबद्ध होऊया असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.