मुंबई : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. ‘फसवणूक नको आरक्षण द्या’, ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात विरोधकांनी घोषणाबाजी केली.
विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा – ओबीसींची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, नितीन राऊत, अमीन पटेल, अमित देशमुख,धीरज देशमुख,जितेश अंतापुरकर ,भाई जगताप, राजेश राठोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी,राजन साळवी, नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) अनिल देशमुख, सुनील भुसारा, विनोद निकोले यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिशाभूल करणाऱ्या सरकारविरोधात घोषणा लिहिलेले फलकही यावेळी झळकवले.