Published On : Wed, May 16th, 2018

चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Advertisement

मुंबई : मिशन शौर्य या उपक्रमाअंतर्गत माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील चार विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील दहा आदिवासी विद्यार्थी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या मोहिमेवर असून यातील चार विद्यार्थ्यांनी हे सर्वोच्च शिखर सर केले. त्यात उमाकांत मडावी, परमेश आले, मनीषा धुर्वे आणि कविदास काठमोडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी बजावलेली कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असून आदिवासी समूहाच्या सर्वांगीण प्रगतीचे ती प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.