Published On : Fri, Mar 27th, 2020

ऊर्जा मंत्री यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा

Advertisement

कोरोना आणि वादळ वाऱ्यात वीज ग्राहकांसाठी ऊर्जा विभागाचे योगदान उल्लेखनीय

नागपूर: कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे बंद असताना आणि मागील दोन दिवस अवेळी झालेल्या वादळ वारा ,पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या वतीने तत्परतेने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची ऊर्जा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे.कोरोना विषाणूंमुळे संसर्ग होऊ नये, म्हणून सर्व जनता घरी आहे. अशावेळी,जनतेला अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणचे अधिकारी-अभियंते-तंत्रज्ञ-कामगार प्रतिकूल परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात व्यस्त आहेत ,आपली सेवा चोखपणे बजावत आहेत.

शुक्रवारी ,सदर येथील मंगळवारी बाजार परिसरात महावितरणचे जनमित्र वीज वाहिनीवर दुरुस्तीचे काम करीत असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांना समजताच त्यांनी ह्या कामाची माहिती घेतली व व्यस्त दिनचर्येतून वीज अधिकारी-कर्मचाऱ्याचे मनोबल वाढविण्याकरिता त्यांचे कौतुक करण्याकरिता ते थेट कार्यस्थळी पोहचले.

कोराना विषाणूच्या पार्शवभूमीवर ,सध्यस्थितीत आपली जबाबदारी वाढली आहे,जनतेला अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी ऊर्जा विभागातील प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी व ही देशसेवा समजून आपली सेवा दिली पाहिजे. काम सुरू करण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन घ्या, आवश्यक असेल त्यावेळी तोंडावर मास्क लावून काम करा,असा पालकत्वाचा सल्ला त्यांनी उपस्थित जनमित्रांना दिला.यावेळी नागपूर परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधिक्षक अभियंता नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे,अतीरिक्त कार्यकारी अभियंता गुरुदेव सोरटे, जनमित्र सतीश पराडकर,समीर पढाण,सचिन शेवारे,विशाल रोकडे,राधेश्याम पटले उपस्थित होते.