Published On : Fri, Jun 1st, 2018

सीतेचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीने झाला – दिनेश शर्मा

Advertisement


नवी दिल्ली: त्रिपुरा येथील मुख्यमंत्री विप्लव देव यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही नवीन शोध लावला आहे. शर्मा म्हणाले, सीतेचा जन्म हा मातीच्या भांड्यामध्ये झाला होता. म्हणजेच रामायणाच्या काळातही टेस्ट ट्युबनं मुलांना जन्म देण्याची पद्धत प्रचलित होती.

मथुरा येथे साजरा होत असलेल्या हिंदी पत्रकारिता दिवसाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. रामायण काळात सीतेचा जन्म एका मातीच्या भांड्यात झाला होता. त्यामुळे रामायण काळापासून टेस्ट ट्युब बेबीची पद्धत अस्तित्वात होती. इतक्यावरच न थांबता महाभारत आणि रामायण काळाचा हवाला देत त्यांनी भगवान नारदमुनी हे त्या काळातले पत्रकार असल्याचंही म्हटलं आहे.

हिंदी पत्रकारिता दिवसाच्या निमित्तानं बोलताना ते म्हणाले, पत्रकारिता तर महाभारत रामायण काळापासूनच सुरु आहे. महाभारत काळाचं माहिती सांगताना ते म्हणाले, गुरुत्वाकर्षण शक्ती, प्लॅस्टिक सर्जरी आणि आण्विक शोध कुठे दुसरीकडे नाही, तर भारतात लागला आहे. तसेच महाभारत काळातही टेक्नॉलॉजी उपस्थित होती. त्यासाठी दिनेश शर्मा यांनी संजय आणि धृतराष्ट्राचं उदाहरण दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपाचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी महाभारत काळातही इंटरनेट आणि उपग्रह होते, असा चमत्कारिक दावा करून चर्चेत आले होते. त्या काळातही लाइव्ह टेलिकास्ट होत असल्यानं हस्तिनापुरात बसून संजयनं कुरुक्षेत्रात होत असलेलं महाभारतातलं युद्ध पाहिलं आणि त्याचा इतिवृत्तांत धृतराष्ट्र महाराजांना कथन केला.