
नागपूर :न्यायदानाचे पवित्र ठिकाण मानल्या जाणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या परिसरात वकील संघटनेच्या निवडणुकीदरम्यान अनुशासनभंगाची घटना घडली. शुक्रवारी मतदानाच्या पार्श्वभूमीवर काही वकिलांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. न्यायालयीन परिसरातच प्रचार साहित्य फेकून देण्यात आल्याने इमारतीत सर्वत्र कचरा साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना निवडणूक समितीचे अध्यक्ष अॅड. किशोर आंबिलवादे यांनी वकिलांचे हे वर्तन अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. “वकिली हा सन्मानाचा व्यवसाय असून शिस्त आणि सभ्यता पाळणे अपेक्षित असते. अशा घटनांमुळे नियमांची पायमल्ली होते,” असे त्यांनी नमूद केले. जिल्हा सरकारी वकील अॅड. नितीन तेलगोटे यांनीही न्यायालयीन वातावरणात अशा प्रकारांना स्थान नसल्याचे सांगत वकिलांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.
दरम्यान, या निवडणुकीत अध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष, ग्रंथालय प्रमुख, दोन उपाध्यक्ष, दोन सहसचिव आणि नऊ कार्यकारिणी सदस्य अशा एकूण १७ पदांसाठी मतदान पार पडले. सुमारे ८४ टक्के मतदान नोंदवले गेले असून ३,३९० पैकी २,८४८ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. निकाल २५ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.
निवडणुकीदरम्यान क्रमांक नसलेल्या बॅलेट पेपरचा मुद्दाही समोर आला. अध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. तरुण परमार यांनी यावर आक्षेप घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा इशाराही दिला. मात्र, छपाईतील त्रुटीमुळे ही चूक झाल्याचे सांगत सर्व उमेदवारांना बोलावून परिस्थिती निवळवण्यात आल्याचे निवडणूक समितीने स्पष्ट केले.








