
नागपूर : शहराच्या सुरक्षेला हादरा देणारी थरारक घटना जरिपटका परिसरात उघडकीस आली आहे. नारा घाट पुलाखाली बोरीत भरलेला एका हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह सापडल्याने नागपूर हादरले आहे. मृताची ओळख राहुल सुनील शाहू (वय ३८, रा. झिंगाबाई टाकळी) अशी झाली आहे.
राहुल साहू हा सदर परिसरातील अचरज टॉवरमध्ये “हॅप्पी डे” नावाचे हॉटेल चालवत होता. दोन दिवसांपूर्वी तो “पैसे घेऊन येतो” असे सांगून मोपेडवरून बाहेर पडला, मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. मोबाईल बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी सदर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
बुधवारी दुपारी काही नागरिकांच्या नजरेस नारा घाट पुलाखाली संशयास्पद बोरी पडलेली दिसली. माहिती मिळताच जरिपटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बोरी उघडताच आतमध्ये राहुलचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली.
प्राथमिक तपासात ही थंड डोक्याने आखलेली हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राहुलची अन्यत्र हत्या करून मृतदेह बोरीत कोंबून पुलाखालून फेकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे.
या धक्कादायक घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांसमोर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
दरम्यान, एसीपी सत्यवीर बंडीवार यांनी सांगितले की, “प्रकरण अत्यंत गंभीर असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.








