
नागपूर : रविवारी मित्रांसोबत फिरायला गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा गिट्टीखदान परिसरातील पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
ही घटना पिटेसूर परिसरातील स्वराज फार्मसमोरील खाणीत घडली असून, या भागात सुरक्षिततेच्या अभावामुळे पुन्हा एकदा जीवितहानी झाली आहे.मृत मुलाची ओळख आर्यन चंद्रशेखर पटेल (वय १६, रा. सिद्दीकी लेआउट, गोधनी) अशी करण्यात आली आहे.
माहितीनुसार, आर्यन हा आपल्या मित्रासोबत रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी संबंधित खाणीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याची खोली जास्त असल्याने त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेत शोधमोहीम राबवली. काही वेळानंतर आर्यनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
त्यानंतर मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी आर्यनचे वडील चंद्रशेखर शेषराव पटेल (वय ३९) यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक चौडकान पठाण करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः तरुणांना, अशा धोकादायक आणि सोडून दिलेल्या खाणी तसेच असुरक्षित जलसाठ्यांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.









