
नागपूर : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेते उमेश कामत पुन्हा एकदा नव्या वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘हे काय नवीन?’ या आगामी सिरीजच्या प्रमोशनसाठी ही जोडी नागपुरात दाखल झाली होती. नागपूरच्या सेंटर पॉईंट हॉटेल येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी थेट संवाद साधत सिरीजबद्दल उत्सुकता निर्माण केली.
दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ही सिरीज 31 मार्चपासून ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. प्रतिसाद प्रोडक्शन्स आणि बहावा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साकारलेली ही कथा आधुनिक नातेसंबंधांतील बदल, चाळीशीतील आयुष्य आणि लग्नानंतरच्या वास्तवावर भाष्य करणारी आहे.
‘हे काय नवीन?’मध्ये प्रिया आणि उमेश रमा आणि आदित्य या विवाहित जोडप्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. बाहेरून सर्व काही परिपूर्ण वाटणाऱ्या या जोडप्याच्या आयुष्यात अचानक निर्माण होणारे प्रश्न, बदलती नाती आणि स्वतःच्या ओळखीचा शोध—याभोवती ही कथा फिरते. “नेहमी आनंदी राहिल्यानंतर पुढे काय?” या प्रश्नावर सिरीजचा गाभा उभा आहे.
प्रिया बापट म्हणाल्या, “नागपूरचे प्रेम नेहमीच खास असते. रमा हे पात्र खूप वास्तववादी आहे. अनेक महिलांना स्वतःशी जोडून घेता येईल असं हे पात्र आहे. नात्यांमध्ये दडून राहिलेले प्रश्न आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास या सिरीजमधून मांडला आहे.”
उमेश कामत यांनी सांगितले, “ही सिरीज लग्नानंतरच्या आयुष्यातील त्या टप्प्याला स्पर्श करते, जो सहसा दुर्लक्षित राहतो. आदित्यचा प्रवास सूक्ष्म आणि भावनिक आहे.
नागपुरात प्रमोशनदरम्यान या जोडीने ‘नागपूर टुडे’शी खास संवाद साधत सिरीजमधील अनुभव, पात्रांची वैशिष्ट्ये आणि प्रेक्षकांकडून असलेल्या अपेक्षा याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
नात्यांमधील बदल, भावनिक गुंतागुंत आणि आयुष्याच्या नव्या टप्प्यांतील प्रश्नांचा वेध घेणारी ‘हे काय नवीन?’ ही सिरीज 31 मार्चपासून ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.









