
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा घेतलेला निर्णय आता मागे घेतला आहे. काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा सक्रिय राजकारणात परतणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेनंतर अनौपचारिक चर्चेत जोशी यांनी सांगितले की, मे 2026 मध्ये त्यांचा विधानपरिषद (MLC) कार्यकाळ संपल्यानंतर ते सुमारे सहा महिन्यांचा ब्रेक घेणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबर 2026 पासून ते पुन्हा सक्रिय राजकीय भूमिकेत दिसतील. या विधानानंतर नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, त्यांच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेनंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वैयक्तिक पातळीवर चर्चा करत निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिल्याचे समजते. तसेच, कार्यकर्त्यांकडूनही भावनिक पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच आपण निर्णय बदलल्याचे जोशी यांनी नमूद केले.
काही दिवसांपूर्वी जोशी यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर नाराजी व्यक्त करत सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. दलबदल, निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणारा कथित अन्याय आणि वाढती सत्तालालसा यावर त्यांनी टीका केली होती. 13 मे रोजी कार्यकाळ संपल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता त्यांनी या भूमिकेत बदल करत, तात्पुरता विराम घेऊन नव्या जोमाने पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे.








