
नागपूर: होळीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने पुणे–नागपूर आणि मुंबई–नागपूर मार्गावर विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. सणासुदीच्या काळात कन्फर्म तिकिटांसाठी होणारी चढाओढ कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे–नागपूर विशेष गाड्या-
पुणे–नागपूर–पुणे मार्गावर चार विशेष गाड्या दोन स्वतंत्र सेवांद्वारे चालवल्या जाणार आहेत.
गाडी क्रमांक 01469/01470 :-
24 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी पुण्याहून मंगळवारी दुपारी 3:50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता नागपूरला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात 25 फेब्रुवारी आणि 4 मार्च रोजी नागपूरहून सकाळी 8:00 वाजता सुटून रात्री 11:30 वाजता पुण्यात आगमन होईल.
या गाडीत 3 द्वितीय वातानुकूलित, 15 तृतीय वातानुकूलित आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
गाडी क्रमांक 01457/01458 :-
25 आणि 26 फेब्रुवारी रोजी पुण्याहून दुपारी 3:50 वाजता सुटेल.
नागपूरहून 4 आणि 5 मार्च रोजी सकाळी 8:00 वाजता परतीची सेवा असेल.
या गाडीत प्रथम वातानुकूलित, द्वितीय व तृतीय वातानुकूलित, 5 शयनयान आणि 6 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
या सर्व गाड्या उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या प्रमुख स्थानकांवर थांबतील. त्यामुळे मार्गावरील इतर प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे.
मुंबई–नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते नागपूर दरम्यान गाडी क्रमांक 02141/02142 ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 22 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान प्रत्येक रविवार आणि मंगळवारी धावणार आहे.
मुंबईहून ही गाडी रात्री 12:20 वाजता सुटून दुपारी 3:10 वाजता नागपूरला पोहोचेल.
नागपूरहून रात्री 8:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता मुंबईत आगमन होईल.
या गाडीत 1 द्वितीय वातानुकूलित, 6 तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान आणि 4 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर या गाडीचे थांबे असतील.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सणासुदीच्या काळातील गैरसोय टाळण्यासाठी आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. या विशेष गाड्यांमुळे होळीच्या काळात नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.









