
नागपूर, : पाणी हे केवळ जीवन नसून ते आरोग्याचे आणि सन्मानाचे प्रतीक आहे. मात्र, जेव्हा हेच पाणी अनधिकृत मार्गाने घरापर्यंत पोहोचते, तेव्हा ते सोबत अनेक धोके आणि चिंता घेऊन येते. नागपूरच्या वस्त्यांमध्ये हाच अनुभव अनेक नागरिक घेत होते. परंतु, आता काळ बदलत आहे. ‘ऑरेंज सिटी वॉटर’ (OCW) च्या जनजागृती मोहिमेमुळे शहरात एक नवी लाट उसळली आहे. ती म्हणजे अनधिकृत जोडण्या सोडून अधिकृत आणि कायदेशीर नळ जोडणी स्वीकारण्याची.
शहरातील काही भागात नागरिक माहितीच्या अभावामुळे किंवा अनवधानाने अनधिकृत नळ जोडण्यांचा वापर करत होते. वरवर पाहता हे सोयीचे वाटत असले तरी, त्यामागे सांडपाणी मिश्रित होण्याचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या जीवघेण्या आजारांचा मोठा धोका होता. शिवाय, अधिकृत ग्राहक नसल्यामुळे कोणत्याही तांत्रिक समस्येवेळी महानगरपालिकेच्या मदतीपासून या नागरिकांना वंचित राहावे लागत होते. ही केवळ पाण्याची समस्या नव्हती, तर ती एका कुटुंबाच्या आरोग्याची असुरक्षितता होती. नळ जोडणीचे नियमितीकरण केल्यामुळे नागपूरकरांच्या आयुष्यात बदल झाला आहे.
सांडपाण्याच्या विळख्यातून सुटका
आशीनगर झोनमधील स्वाती प्रवीण लांजेवार यांची व्यथा मोठी होती.”आम्हाला सांडपाणी मिश्रित पाणी येत होते,” त्या सांगतात. सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकत्र येणे ही कोणत्याही कुटुंबासाठी मोठी चिंतेची बाब होती. त्यांनी ओसीडब्ल्यूकडे धाव घेतली, तक्रार केली आणि आता नवीन पाईपलाईनमुळे त्यांच्या घरी शुद्ध पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे.
दोन वेळेच्या पाण्याचे समाधान
सतरंजीपुरा झोनचे राजाराम पराते सांगतात की, “आता दिवसातून दोनदा स्वच्छ पाणी येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, मीटरप्रमाणे बिल येत असल्याने मी समाधानी आहे.” पारदर्शकता आणि विश्वासार्हता ही कायदेशीर जोडणीची मोठी देणगी त्यांना मिळाली आहे.
पाण्यासाठीचा संघर्ष संपला
“या भागात पूर्वी पाण्याचे खूप प्रश्न होते, पण आता ते पूर्णपणे सुटले आहेत,” अशी भावना सतरंजीपुरा झोनच्याच श्री जॉर्जी पन्ना यांनी व्यक्त केली.
नागरिकांनी अधिकृत मार्ग स्वीकारल्यामुळे त्यांना आता केवळ पाणीच मिळत नाही, तर खालील सुविधांच्या माध्यमातून एक प्रकारचे ‘सुरक्षा कवच’ मिळाले आहे याद्वारे आरोग्याची हमी मिळाली आहे. २४/७ मदत केंद्र आणि तक्रारींचे जलद निराकरण झाले आहे. मोबाईलवर येणारे पाणी पुरवठ्याचे आणि दुरुस्तीचे नियमित अपडेट्स मिळत आहे. “एक जबाबदार नागरिक म्हणून कायदेशीर नळ जोडणीचा वापर करणे, हे केवळ तुमच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण शहराच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे आवाहन एनएमसी-ओसीडब्ल्यूने केले आहे.
नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून कायदेशीर नळ जोडणीचाच वापर करावा, असे आवाहन एनएमसी-ओसीडब्ल्यूने केले आहे. यामुळे केवळ वैयक्तिक लाभच मिळत नाहीत, तर शहराच्या आरोग्य व्यवस्थेलाही बळकटी मिळते.
पाणी पुरवठ्याबाबत अधिक माहिती किंवा मदतीसाठी ग्राहक NMC-OCW हेल्पलाईन क्रमांक १८००२६६९८९९ वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com या ईमेलवर आपली शंका पाठवू शकतात.








