
नवी दिल्ली : उद्या (शनिवार, ७ फेब्रुवारी) ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अॅप-आधारित कॅब सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरातील चालकांनी एकदिवसीय संपाची घोषणा केली असून या आंदोलनाला “ऑल इंडिया ब्रेकडाउन” असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी प्रवास व्यवस्थेची आगाऊ तयारी ठेवावी, असा सल्ला दिला जात आहे.
हा संप TGPWU (तेलंगणा गिग वर्कर्स युनियन) आणि इतर संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून पुकारण्यात आला आहे. संघटनांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे की ७ फेब्रुवारी रोजी चालक अॅप्स लॉग-इन करणार नाहीत. परिणामी कॅब, ऑटो किंवा बाईक टॅक्सी सहज उपलब्ध होणार नाहीत.
नेमक्या काय आहेत मागण्या?
चालकांचे म्हणणे आहे की अॅप कंपन्यांकडून भाडे आणि कमिशन संदर्भात कोणतेही ठोस नियम नाहीत.
सरकारने किमान भाडे दर तातडीने निश्चित करावेत
दर ठरवताना चालकांशी सल्लामसलत करावी
खाजगी (पांढऱ्या नंबर प्लेट) वाहनांचा व्यावसायिक वापर थांबवावा
कंपन्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवावे
संघटनांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
वाढते खर्च, घटते उत्पन्न-
पेट्रोल-डिझेल दरवाढ, कंपन्यांकडून वाढते कमिशन कपात आणि अनिश्चित कमाई यामुळे चालकांमध्ये असंतोष वाढला आहे. काही चालकांनी “१० मिनिट डिलिव्हरी”सारख्या दबावाच्या पद्धतींचाही निषेध केला आहे. सुरक्षितता आणि कामाच्या अटींबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
प्रवाशांवर परिणाम?
देशव्यापी संप यशस्वी झाल्यास शहरी भागात वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बस, मेट्रो किंवा अन्य सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी २७ जानेवारी २०२६ रोजी बँक कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या मागण्यांसाठी देशव्यापी संप केला होता. आता गिग वर्कर्सच्या आंदोलनामुळे सेवा क्षेत्रात पुन्हा एकदा असंतोषाची लाट दिसत आहे.








