
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेसला झालेल्या धक्कादायक पराभवानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. सर्वाधिक २७ नगरसेवक असूनही काँग्रेसला सत्ता मिळवता न आल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे.
भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताने काँग्रेसच्या वैशाली महाडुळेंचा पराभव करत महापौरपद पटकावले. विशेष म्हणजे, भाजपाला उद्धवसेनेचा पाठिंबा मिळाल्याने समीकरणे बदलली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे प्रशांत दानव आणि काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख यांना प्रत्येकी ३२ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीद्वारे दानव यांची निवड झाली.
या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “चंद्रपूरमध्ये २७ नगरसेवक निवडून आणूनही सत्ता स्थापन करता आली नाही, याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. आम्हाला दोष देण्यात काही अर्थ नाही. तुमच्याकडे सर्वाधिक संख्या होती, पण तुमच्यात एकवाक्यता नव्हती.”
राऊत यांनी काँग्रेसमधील गटबाजीवरही बोट ठेवत म्हटले की, पक्ष विस्कळीत झाल्यामुळे वंचित आणि एमआयएमसारख्या पक्षांनीही पाठिंबा दिला नाही. “तुमच्या दोन गटांतील वादामुळे इतर पक्षांना तटस्थ राहावे लागले. त्यामुळे वेगळा निर्णय घ्यावा लागला,” असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मदत करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते, असे सांगत राऊत म्हणाले की, “विरोधी पक्षात बसावे लागले तरी चालेल, पण भाजपाला मदत करायची नाही, ही आमची भूमिका होती. तरीही काँग्रेसच्या घोळामुळे परिस्थिती बदलली.” या संपूर्ण प्रकरणाची मुंबईत चर्चा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनीही काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. “शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही काँग्रेससोबत चर्चा करत होतो. मात्र, आम्हाला शिवसेनेची गरज नाही, अशी भूमिका त्यांची होती. आमचा वारंवार अपमान होत होता. हा विषय आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवला आणि त्यांच्या मार्गदर्शनात निर्णय घेतला. शेवटी पक्ष आणि कार्यकर्ते टिकले पाहिजेत, हीच भावना होती,” असे गिर्हे यांनी सांगितले.चंद्रपूर महापालिकेतील या निकालामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद उघड झाला असून, आगामी स्थानिक राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








