
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रात वाघाला विद्युत प्रवाह लावून ठार मारल्याच्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने ६ आरोपींना शिक्षा सुनावली आहे. रामटेक येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. बोराणी यांनी या प्रकरणाचा निकाल दिला.
या प्रकरणात ५ आरोपींना प्रत्येकी ३ वर्षांचा सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास ९ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच इतर कलमान्वये २ वर्षांची साधी कैद व २,५०० रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. आणखी एका आरोपीस २ वर्षांची साधी कैद व २,५०० रुपयांचा दंड, तर एका आरोपीस ३ वर्षांचा सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन क्षेत्रसंचालक ए. लक्ष्मी व डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे व सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांनी केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विहित कालावधीत निकाल देण्यात आला. न्यायालयाने एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवली असून ११३ दस्तावेज व ३७ साहित्य पुरावे तपासण्यात आले.








