
नागपूर : नागपूर महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता असतानाही, महापालिकेच्या अखत्यारित पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी कंपनीविरोधात भाजप नेत्यांनाच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. ‘ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स’ या कंपनीने नियमबाह्य पद्धतीने 100 कामगारांना कामावरून काढल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी आजपासून (2 फेब्रुवारी) साखळी उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे.
भाजप नेते ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांनी पत्रकारांशी बोलताना गंभीर आरोप केले. किमान वेतनाची मागणी केल्यामुळे या कामगारांना कामातून काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांना कायद्यानुसार दरमहा किमान 23 हजार रुपये वेतन मिळणे अपेक्षित असताना, कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून फक्त 13 हजार रुपये वेतन देत असल्याचा दावा यादव यांनी केला.
कामगारांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला, तेव्हा त्यांच्यावर ‘कंपनीविरोधी कारवाया’ केल्याचा ठपका ठेवून थेट कामावरून काढून टाकण्यात आले. हा प्रकार कामगार कायद्यांचे उल्लंघन करणारा असून, गरीब कामगारांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आलेले शंभर कामगार भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सच्या व्यवस्थापनाविरोधात साखळी उपोषण करणार आहेत. सात दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन आणि संबंधित कंपनी या प्रकरणावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी ‘विजयगड’ बंगला सज्ज-
दरम्यान, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासाठी नागपूरच्या रविभवन परिसरातील ‘विजयगड’ हा बंगला सज्ज करण्यात आला आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हाच बंगला विशेषतः तयार करण्यात आला होता. हिवाळी अधिवेशनादरम्यान सकाळी लवकरपासून या बंगल्यावर मोठी वर्दळ पाहायला मिळत असे. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नागपूर किंवा विदर्भ दौऱ्यावर आल्यास त्या याच ‘विजयगड’ बंगल्यात वास्तव्यास राहणार आहेत.








