Published On : Sat, Dec 6th, 2025
By Nagpur Today Nagpur News

बाबासाहेबांचा विचार चिरंतन: ६ डिसेंबर ‘महापरिनिर्वाण दिन’ का पाळला जातो?

Advertisement

संविधान निर्माता आणि सामाजिक समतेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी संपूर्ण देशात ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरी होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निधन झाले. त्यांच्या अपरंपार कार्याचा, लोकशाहीतील योगदानाचा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाला दिलेल्या नूतन उर्जेचा स्मरणदिवस म्हणून हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. बौद्ध धर्मातील ‘महापरिनिर्वाण’ ही संज्ञा मुक्तीच्या सर्वोच्च अवस्थेला सूचित करते—आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारल्याने त्यांच्या स्मृतिदिनासाठी या शब्दाचा वापर केला जातो.

चैत्यभूमीची ऐतिहासिक पार्श्वभूमी-
दिल्लीमध्ये देह ठेवलेल्या बाबासाहेबांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले आणि ७ डिसेंबर १९५६ रोजी शिवाजी पार्कजवळील समुद्रकिनारी लाखो अनुयायांच्या उपस्थितीत त्यांच्या अंत्यसंस्कार विधी पार पडले. पुढील काळात येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाला ‘चैत्यभूमी’ अशी ओळख मिळाली. बाबासाहेबांच्या अस्थींचा कलश येथे ठेवण्यात आल्यामुळे हे ठिकाण आंबेडकरी विचारांचे प्रमुख केंद्र बनले असून, भाविकांच्या दृष्टीने ते पवित्र भूमी म्हणून मानले जाते.

Gold Rate
06 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,28,300 /-
Gold 22 KT ₹ 1,19,300 /-
Silver/Kg ₹ 1,80,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भक्तांची लाखोंची गर्दी-
डिसेंबरची पहिली आठवडा सुरू होताच देशाच्या कानाकोपऱ्यातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने मुंबईकडे प्रवास सुरू करतात. खासगी गाड्या, एस.टी. बस, रेल्वे आणि पायी यात्रांद्वारे लाखो लोक चैत्यभूमीवर दाखल होतात. दरवर्षी सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक लोक येथे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. या गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी नगरपालिका, पोलीस विभाग, विविध स्वयंसेवी संस्था आणि बौद्ध विहाराच्या समित्या अथक परिश्रम घेतात.

२००२ मध्ये स्थापन झालेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती’मुळे भक्तांसाठी पाणी, वैद्यकीय सेवा, विश्रांती केंद्रे, दिशादर्शन सुविधा आणि सुरक्षेची मजबूत व्यवस्था केली जाते. २०१७ पासून महापरिनिर्वाण दिन अधिक सुसंगतपणे—मौन साधना, बुद्धवंदना आणि मंगलमैत्री—यांच्या माध्यमातून आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

देश-विदेशात जपली जाणारी स्मृती-
चैत्यभूमीवरील गर्दीची भव्यता जरी सर्वांचे लक्ष वेधून घेते, तरी बाबासाहेबांच्या स्मृतीचा उत्सव फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रासह देशभरातील बौद्ध विहार, सामुदायिक सभागृहे, शिक्षणसंस्था आणि सरकारी कार्यालयांमध्येही ६ डिसेंबर विशेष श्रद्धेने पाळला जातो. अनेक राजकीय नेते, सामाजिक विचारवंत आणि बुद्धिष्ट संस्था चैत्यभूमीवर येऊन त्यांना आदरांजली वाहतात.

Advertisement
Advertisement