
नागपूर – खापरखेडा परिसरातील शांत वातावरणाला शुक्रवारी एका हृदयद्रावक घटनेने हादरा बसला. मोबाईल फोन न दिल्याच्या कारणावरून अवघ्या तेरा वर्षांच्या आठवीतील विद्यार्थिनीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने कुटुंबीय, शेजारी आणि समाजमन सुन्न झाले असून मुलांमध्ये वाढत चाललेली मोबाईलची आसक्ती किती भयानक रूप धारण करू शकते याचा गंभीर इशारा यामुळे मिळाला आहे.
मनोरोग तज्ज्ञांच्या मते, या प्रकाराच्या घटनांना मुलांमधील भावनिक अपरिपक्वता जबाबदार आहे. लॉकडाउननंतर मोबाईल मुलांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला. अभ्यासानंतरही तासन्तास गेमिंग, सोशल मीडिया, रील्स आणि चॅटिंगमध्ये गुंतण्याची सवय अनेक विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालली आहे. हळूहळू ही सवय व्यसनात रूपांतरित होते आणि त्याचा परिणाम मानसिक स्थैर्य, राग नियंत्रण आणि सहनशक्तीवर दिसू लागतो.
डॉ. अभिषेक सोमानी सांगतात की आजची मुलं त्वरित प्रतिक्रिया देण्याकडे झुकतात. ‘नाही’ हे एकच शब्द त्यांना पचत नाहीत आणि रागाच्या भरात ते अशा अविचारी निर्णयांकडे वळतात जे कधी कधी जीवघेणे ठरतात. गेम्समधील स्पर्धा, सोशल मीडियावरील तुलना आणि सतत उत्तेजना मिळावी ही अपेक्षा मुलांना मानसिकदृष्ट्या अस्थिर बनवत असल्याचे ते अधोरेखित करतात.
तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, मुलांमध्ये वाढत जाणारी चिडचिड, मित्रांपासून दुरावा, झोपेतील बदल, अभ्यासात अनास्था आणि वाढता स्क्रीन टाईम ही सर्व लक्षणे गंभीर संकेत मानली जातात. अशा स्थितीत पालकांनी मुलांशी सतत संवाद ठेवणे, त्यांचे ताणतणाव समजून घेणे आणि त्यांना भावनिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोबाईल वापरण्याची मर्यादा निश्चित करणे आणि घरी संवाद, खेळ, वाचन यांना चालना देणारे वातावरण तयार करणे हेही तितकेच आवश्यक आहे.
कडक शब्दांत नकार देण्याऐवजी त्यामागील कारण मुलांना समजावून सांगणे आणि त्यांच्या वागण्यात अचानक बदल दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे हाच एक सुरक्षित मार्ग असल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात. काउन्सेलिंग हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा पर्याय असून, त्याबाबत हिचकिचाट ठेवणे जीवघेणे ठरू शकते.
खापरखेड्यातील ही घटना फक्त एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर संपूर्ण समाजासाठी चेतावणी आहे. मोबाईल आता केवळ मनोरंजनाचे साधन नसून मुलांच्या भावनिक आणि मानसिक संरचनेवर खोलवर परिणाम करणारा घटक बनला आहे. वेळेवर जागरूक राहणे आणि मुलांच्या भावविश्वाचा शोध घेणे हे प्रत्येक पालकाचे आज प्राथमिक कर्तव्य ठरते.









