
नागपूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी नागपूरात सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस आज अधिक तापलेला दिसला. आंदोलनकर्त्यांची संख्या वाढली असून, नागपूर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
आंदोलनस्थळी नागरिक, कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढत असताना, परिस्थिती तणावपूर्ण बनू नये यासाठी पोलिसांकडून दक्ष पावलं उचलण्यात येत आहेत. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवत आंदोलन कायदेशीर मर्यादेत राहूनच पार पाडावं, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी ‘नागपूर टुडे’ शी बोलताना संतुलित आणि संयमी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं.आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. कायदेशीर चौकटीत राहूनच सर्व कारवाई केली जाईल. शांतता आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं सर्वात मोठं प्राधान्य आहे.”
सिंगल यांच्या या परिपक्व आणि शांत भूमिकेमुळे प्रशासनाने तणावग्रस्त वातावरणातही नियंत्रण राखलं आहे. आंदोलनकर्त्यांचा उत्साह वाढत असला तरी पोलिसांचा संयम आणि शिस्तबद्ध भूमिका शहरात शांतता टिकवण्यासाठी महत्वाची ठरत आहे.
नागपूर पोलिसांकडून शहरभर पोलीस गस्त वाढवण्यात आली असून, आंदोलन स्थळाजवळ वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून अफवा पसरू नयेत, यासाठी सायबर शाखाही सतर्क ठेवण्यात आली आहे.
आंदोलनाची पार्श्वभूमी :
बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारकडे “शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी” तसेच अन्य मागण्यांसाठी नागपूरात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. सुरुवातीला शांततेत सुरू झालेलं हे आंदोलन कालपासून अधिक आक्रमक झालं असून, काही ठिकाणी महामार्ग अडवण्याचे प्रकारही घडले.
तथापि, पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांसोबत संवाद सुरू ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
शहरात सध्या कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागपूर पोलिस दल पूर्ण सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.








