नागपूर :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीसंदर्भात केलेल्या लेखावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राहुल गांधींवर खोटं बोलून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला.
“बिहार निवडणुकीपूर्वीच राहुल गांधींनी पराभव स्वीकारला आहे. त्यांनी स्वतःच स्वतःच्या पक्षाची हार कबूल केली आहे. आत्मविश्वास हरवलेला नेता लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोट्या गोष्टी सांगतो आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली.
फडणवीसांनी हा लेख महिलांचा अवमान करणारा असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटलं, “महिलांच्या सन्मानाशी संबंधित विषयांवर राजकारण करणं हे योग्य नाही. अशा लेखांनी महिलांची प्रतिष्ठा धोक्यात येते.”
त्याचबरोबर राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारतीय निवडणूक व्यवस्थेवर शंका उपस्थित करून देशाची प्रतिमा मलिन केल्याचाही आरोप फडणवीसांनी केला. “हे वर्तन राजकीय अपरिपक्वतेचे द्योतक आहे,” असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर कडवट टीका केली.