नागपूर : राज्यात पुन्हा महायुती सरकार सत्तेत येण्यामागे ‘लाडकी बहीण योजना’ ही महत्वाकांक्षी ठरल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये महिना गरजू महिलांना देण्यास सुरुवात केली. मात्र महायुतीची सत्ता आल्यानंतर सरकारने अपात्र महिलांना वगळण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर ५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
लाभार्थ्यांची संख्या घटली-
लाडकी बहीण योजने मधून 5 लाख महिलांची नावे हटवण्यात आली असून, त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. डिसेंबरमध्ये लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटी होती तर जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 2.41 कोटी इतका होता. मात्र आता ज्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत.
महिलांकडून पैसे परत घेण्याचा सरकारचा विचार नाही-
नाव वगळण्यात आलेल्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेची घोषणा झाल्यानंतर जुलै ते जिसेंबर या कालावधीत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात एकूण 450 कोटी रुपये ट्रान्स्फर झाले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ही रक्कम परत घेण्यात आलेली नाही आणि तसे करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही. ज्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे त्यांना पुढील लाभ मिळणार नाहीत, परंतु आधीच जमा केलेली रक्कम काढणे योग्य होणार नाही, असेही तटकरे यांनी नमूद केले.
‘या’ महिला ठरल्या अपात्र –
महिला व बालविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, विविध कारणांमुळे पाच लाख महिला अपात्र ठरल्या. त्यानंतर, सरकारच्या या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 2024 मधील 2.46 कोटींवरून घटून गेल्या महिन्यात 2.41 कोटी झाली आहे. अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांपैकी 1.5 लाख महिला या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत. तर 1.6 लाख महिलांपैकी काहीकंडे एकतर चारचाकी वाहने आहेत किंवा त्यापैकी काही जणी या नमो शेतकरी योजनेसारख्या इतर सरकारी योजनांच्या लाभार्थी आहेत.