मुंबई : आदिवासी समाजासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिला नाही.
या निषेधार्थ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार हिरामण खोसकर, हेमंत सावरा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उडी मारली. यावेळी त्यांनी काही कागदपत्रही फेकली. यामुळे मंत्रालयात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. दुसरीकडे आदिवासांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी (02 ऑक्टोबर) सह्याद्री अतिथीगृह येथे भेटायला गेलेल्या राज्यातील आदिवासी आमदारांना भेटीसाठी तब्बल सात तास वाट बघावी लागली. सात तास बसून राहून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट न होऊ शकल्याने आदिवासी आमदारांमध्ये असंतोषाची भावना पसरली.
यानंतर आदिवासी आमदारांनी आज, शुक्रवारी (04 ऑक्टोबर) मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र त्यातही ते समाधानी झाले नसल्याने नरहरी झिळवाळ यांच्यासह काही आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उडी मारत विरोध प्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवाळ यांनी आंदोलन पुकारले. सध्या त्यांना संरक्षक जाळीवरुन खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले.
आमदारांची नेमकी मागणी कोणती ?
धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका सरकारने मागे घ्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसोबतच नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी आमदार आंदोलनातही सहभाग घेतला आहे. ज्या समाजाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. पेसी भरतीच्या ऑर्डर तयार असताना कोर्टाच्या आदेशामुळे त्या देण्यात आलेल्या नाहीत, असे झिरवळ म्हणाले होते.