मुंबई : राज्यात पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना अध्यक्षांनी बोलण्याची परवानगी दिल्यानंतर थोरात यांनी सांगितले की, राज्यातील पावसाची स्थिती गांभीर्याने पाहायची गरज आहे. ५० टक्के क्षेत्रात अद्याप पाऊस नाही. २० टक्के पेरण्या झाल्यात. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला. दुर्दैवाने सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणाचे लक्ष नाही. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, दिल्ली वारी यामुळे सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे सभागृहात स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करावी अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. विरोधी पक्षाने जो प्रश्न उपस्थित केला त्याचे शासनाला गांभीर्य आहे. राज्यात काही भागात पाऊस कमी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पुणे, नाशिक विभागात पेरण्या कमी झाल्या आहेत. आयएमडीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला.
येत्या आठवडाभरात चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली तर सरकारने नियोजन केले आहे. १० हजार कोटी रुपये गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांसाठी मदत केली आहे. काही शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण नाही म्हणून त्यांना मदत मिळाली नाही. तेदेखील काम सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.