नागपूर : महावितरणच्या वतीने एक गाव-एक दिवस या उपक्रमा अंतर्गत १ जानेवारी २०२२ पासून थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी देणे ही कामे सुरुवात करण्यात आली असून नागपूर परिमंडलात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेत्तृत्वात महावितरणचे अभियंते,अधिकारी जनमित्र आणि कर्मचारी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.हा उपक्रम राबवितांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिले आहेत.
ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील गावात एक गाव – एक दिवस हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात महावितरणकडून करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये वीज तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, गांजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय वीजमीटरची तपासणी, सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, , नावात बदल, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करून वीज ग्राहकांच्या समस्यांचे समाधान करण्यात येणार आहे.
महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गावकऱ्यांशी थेट संवाद साधून मोबाईल अँप, वीजसुरक्षा व ग्राहक सेवेबाबतचे प्रबोधन करणार आहेत. कृषी पंप वीज जोडणी धोरण-२०२० अंतर्गत नवीन वीज जोडणी देणे व शेतकर्यांना भरघोस सवलत देणार्य या धोरणांत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,यासाठी शेतकर्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. शेती पंपास कॅपॅसिटर बसविण्याचे फायदे, विद्युत अपघात टाळण्यासाठी सूचना व उपाय योजनांची माहिती या उपक्रमात दिली जाणार आहे. तसेच अनधिकृत वीज वापराची तपासणी करून त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी,शासकीय कर्मचारी,स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी यांनी सहकार्य करावे व महावितरणचा हा लोकाभिमुख उपक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावावा,असे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.
फोटो ओळ :एक गाव एक दिवस अभियानात कुही उपविभाग अंतर्गत मांढळ गावातील राम मंदिर रोहित्राची वितरण पेटी बदलताना महावितरणचे कर्मचारी